
जालना : सरंपच संतोष देशमुख यांचा खून पाडूनही यांचे पोट भरले नाही. आरोपीला सोडा म्हणून धनंजय मुंडेच्या गुंड टोळ्या रस्त्यावर उतरून दहशत माजवत आहेत. दया,माया, माणुसकी यांच्यात शिल्लकच राहिलेली नाही. महाराष्ट्रासाठी हे चांगले नाही, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याकडे गांभीर्याने पहावे आणि सावधही रहावे. हा वार तुमच्यावरही उलटू शकतो,असा सावधानतेचा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तसेच या टोळ्यांचा नायनाट करून बीड जिल्हा भय मुक्त करा,असे आवाहनही त्यांनी केले.
अंतरवाली सराटी येथे नुकतीच सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली होती. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली या संदर्भात जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. बीड जिल्ह्यामध्ये वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांनी पोहोचलेल्या गुंड टोळ्या यांची प्रचंड दहशत आहे. संपूर्ण जिल्हा यांच्या दहशतीमुळे भयभीत आहे. आरोपींच्या सुटकेसाठी आंदोलने केली जात आहेत, हे सगळे रोखायचे असेल तर धनंजय मुंडे यांच्या या गुंड टोळ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ जेरबंद कराव्यात, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.
धनंजय देशमुख हे न्यायासाठी झटत आहे, पायपीट करत आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब भयभीत आणि दहशतीखाली वावरत आहे. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. धनंजय देशमुख आणि त्यांचे कुटुंब यांना समाज वाऱ्यावर सोडणार नाही, या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी आणि मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. (Beed News) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख आणि अख्खे कुटुंब कळपातील एखादे हरण गायब झाल्यानंतर जसे भयभीत होते तसे भयभीत झाले आहे.
वाल्मीक कराड आणि त्यांच्या गुंडांकडून धमकी येत असल्याने आपले काही बरे वाईट झाले तर कुटुंबाचे कसे होईल? ही चिंता आणि भीती धनंजय देशमुख यांना सतावते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एकही आरोपी सुटणार नाही असे, आश्वासन दिले होते. त्यानंतर सीआयडी, एसआयटी आणि आता न्यायालयीन चौकशी समिती स्थापन केल्यामुळे सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असे दिसते. सरपंच संतोष देशमुख यांची निर्घूण हत्या केल्यानंतर आरोपींना सोडा म्हणून रस्त्यावर उतरून जाळपोळ करणारे, शहर बंद करणारे हे त्या जातीला बदनाम करत आहेत.
हे चित्र महाराष्ट्रासाठी योग्य नाही, मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अशा प्रकारामुळे महाराष्ट्र बदनाम आणि कलंकित होत आहे. धनंजय मुंडे यांच्या गुंड टोळ्यांनी संतोष देशमुख यांचे कुटुंब उघड्यावर आणले आहे. न्यायासाठी हे कुटुंब वणवण भटकत आहे, उन्हात एखादी व्यक्ती होरपळावी तशी या कुटुंबाची होरपळ सुरू आहे. एवढा खून होऊन सुद्धा धनंजय मुंडे यांच्या गुंड टोळ्ंयाचे पोट भरलेली नाही. आरोपीला सोडा, अशी मागणी करत या टोळ्या रस्त्यावर उतरवण्यात आल्या आहेत.
या टोळ्यांना फक्त पैसा, संपत्ती आणि त्यातून राजकारण एवढेच कळते. त्यांना जात, धर्म, माणुसकी अशा कुठल्याच गोष्टी कळत नसल्याने त्यांच्या दहशतीने आणि गुंडगिरीने महाराष्ट्राला डाग लागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करणे गरजेचे आहे. केवळ संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयावरच नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्यावर दहशतीचा सावट आहे. जातीयवाद करून दंगली भडकवण्याचा प्रयत्न आणि षडयंत्र सुरू असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केली.
फडणवीस साहेबांना विनंती आहे की ही दहशत आणि भीती घालवायची असेल तर या गुंड टोळ्या जेरबंद करा, त्यांना आवरा असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले. राज्यासाठी हे वातावरण चांगले नाही, फडणवीस साहेब या टोळ्या राज्याला वेगळ्या दिशेने घेऊन जाऊ पाहत आहेत. जातीय द्वेष निर्माण करून दंगली भडकवण्याचा धनंजय मुंडे आणि त्यांच्या टोळ्यांचा प्रयत्न आहे की काय? अशी शंका आता येऊ लागली आहे.सराईत गुन्हेगारांना प्रशिक्षण द्यावे, अशा पद्धतीने या टोळ्या रस्त्यावर उतरून दहशत निर्माण करत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला.
माझे फडणवीस साहेबांना सांगणे आहे की त्यांनीही सावध व्हावे. हा वार त्यांच्यावरही उलटू शकतो, धनंजय मुंडे आणि त्यांच्या टोळ्या अत्यंत क्रूर आहेत, असा सावधानतेचा इशाराही जरांगे पाटील यांनी यावेळी दिला. खून पाडून आरोपीला सोडा अशी मागणी जर हे लोक करत असतील तर सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोहोबाजूने या टोळ्यांचा बंदोबस्त करून त्यांचा नायनाट केला पाहिजे. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे, त्यामुळे फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे यातून एकही आरोपी सुटणार नाही, असा विश्वास आम्हाला आहे असेही जरांगे पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.