

अकोट नगरपरिषद निवडणुकीनंतर एमआयएमला ‘अकोट विकास मंचा’त सामील करण्यात आले होते.
भाजपसह विविध पक्षांनी एमआयएमसोबत हातमिळवणी केल्याने तीव्र टीका झाली.
टीकेच्या पार्श्वभूमीवर एमआयएमने अखेर ‘अकोट विकास मंचा’तून माघार घेतली आहे.
Akola News : योगेश फरपट
नुकत्याच झालेल्या अकोट नगरपरिषद निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांना सोबत घेऊन स्थापन करण्यात आलेल्या ‘अकोट विकास मंचा’मध्ये ‘एआयएमआयएम’चा समावेश करण्यात आल्याने पक्षश्रेष्ठींमध्ये नाराजी उसळली आहे. विद्यमान आमदारांनी पक्षाच्या मूलभूत ध्येय–धोरणांना विरोधात जाऊन हा निर्णय घेतल्याचा आरोप होत असून, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या संदर्भात आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांच्याकडून खुलासा मागितला आहे.
अकोट नगरपरिषद निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढविण्यात आली होती. या निवडणुकीत ‘एआयएमआयएम’चे पाच नगरसेवक विजयी झाले. त्यानंतर अकोला येथे झालेल्या बैठकीत ‘एआयएमआयएम’ला ‘अकोट विकास मंचात’ सामील करून घेण्यात आले. या मंचात दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार जनशक्ती पक्ष आणि भाजप यांचा सहभाग होता.
मात्र एमआयएमला सोबत घेतल्याने सर्वत्र टीकेचे वारे सुरू झाले. भाजपने आपल्या मूळ विचारधारेपासून दूर जात एमआयएमसारख्या पक्षाशी हातमिळवणी केल्याने सत्तेची लालसा असल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ लागला. राज्यात विविध महापालिकांच्या निवडणुका सुरू असताना हा निर्णय भाजपसाठी राजकीयदृष्ट्या अडचणीचा ठरला. त्याचप्रमाणे निर्माण झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ‘एआयएमआयएम’लाही बॅकफूटवर जावे लागले.
या घडामोडीनंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडून स्पष्टीकरण मागविले आहे. तसेच ‘एआयएमआयएम’चे प्रदेश उपाध्यक्ष युसूफ मो. शफी पुंजानी यांनी ‘अकोट विकास मंचाला’ दिलेला पाठिंबा मागे घेतल्याचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.
ओवेसींची नाराजी
अकोला महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू असताना, अकोटातील स्थानिक स्तरावर घेतलेल्या या निर्णयाचा अकोल्यात ‘एआयएमआयएम’ला बसण्याची भीती व्यक्त केली जात होती. तसेच ‘एआयएमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीही नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
‘एआयएमआयएम’ने पाठिंबा काढला
पाचही नगरसेवकांनी ‘अकोट विकास मंचाला’ दिलेला बिनशर्त पाठिंबा आज परत घेतला. तसे पत्रही जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहे. याबाबतची माहिती प्रदेश उपाध्यक्ष युसूफ मो. शफी पुंजानी व आरिफ शहा हन्नान शहा (अकोट शहराध्यक्ष) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. नगरपरिषदेत बहुमत नसलेल्या भाजपने ‘एआयएमआयएम’ला मंचात सामील करून घेतले होते. या मंचात दोन्ही शिवसेना गट, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांचाही समावेश होता.
1. अकोट विकास मंच म्हणजे काय?
→ अकोट नगरपरिषदेत सत्तास्थापनासाठी तयार करण्यात आलेली बहुपक्षीय आघाडी.
2. एमआयएमला मंचात का सामील करण्यात आले होते?
→ निवडणुकीत पाच नगरसेवक विजयी झाल्याने त्यांना सत्तास्थापन प्रक्रियेत सामील केले गेले.
3. भाजपवर टीका का झाली?
→ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून एमआयएमसोबत युती केल्याने टीका झाली.
4. एमआयएमने मंचातून माघार का घेतली?
→ वाढत्या राजकीय टीकेमुळे आणि दबावामुळे एमआयएमला बॅकफूटवर जावे लागले.
5. याचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो?
→ भाजपसह इतर पक्षांच्या राजकीय भूमिकांवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.