NCP News : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या लातूर शहरातून आठवणी पुसून टाकण्याची भाषा काल-परवा कोणी तरी इथ येऊन बोलून गेलं. पण कोणी कोणाची ओळख अशी पुसून टाकू शकत नाही. भावनिक मुद्दा करून चालणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अप्रत्यक्षरित्या भाजपवर निशाणा साधला. 2004 मध्ये राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्त आमदार निवडून आलेले असताना सुद्धा आदरणीय शरद पवार साहेबांनी तेव्हा विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, याची आठवण अजित पवारांनी करून दिली.
लातूर महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत बोलताना अजित पवारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा उल्लेख केला. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे राज्यात जेव्हा सरकार होते तेव्हा काँग्रेसचे आमदार संख्येने राष्ट्रवादी पेक्षा कमी असताना आम्ही त्यांना मुख्यमंत्री करण्याचा मनाचा मोठेपणा दाखवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने हे करून दाखवले होते हे अजित पवार यांनी आवर्जून सांगितले.
मी विलासराव देशमुख यांच्यासोबत काम केलेले आहे. 2004 मध्ये राष्ट्रवादीचे आमदार जास्त निवडून आलेले असताना शरद पवारांनी सांगितले आणि विलासराव पुन्हा मुख्यमंत्री झाले. कोणी कोणाची ओळख अशी पुसून टाकू शकत नाही, भावनिक मुद्दा करून चालणार नाही. लातूरमध्ये कोणी तरी येऊन गेलं आणि विलासरांवाची ओळख या शहरातून पुसून टाकू असं म्हणून गेलं.
विलासराव देशमुख यांचा स्वभाव, काम मला माहित आहे. महाराष्ट्रासाठी त्यांनी दिलेलं योगदान विसरता येणार नाही. आपली मराठी संस्कृती आहे, यशवंतराव, वसंतदादांचा वारसा, पवारसाहेबांची शिकवण आपल्याला आहे. आदराने बोला ना, त्याला पैसे पडतात का? याच भागात येऊन त्यांच्याच सुपुत्राबद्दल काही तरी बोलायचं हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. तुम्ही तुमची भूमिका जरूर मांडा, शेवटी संविधानाने प्रत्येकाला मताचा अधिकार दिलेला आहे, त्याचा वापर मतदार करत असतात, असेही अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी लातूरमध्ये येऊन भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा उल्लेख करत काँग्रेस या आपल्या जुन्या मित्र पक्षाला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. राज्याच्या सत्तेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार होते. स्वतः अजित पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काम केले आहे, याची आठवण त्यांनी आवर्जून केली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेली चुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधारली होती. विलासराव देशमुखांबद्दल आदरभाव व्यक्त करतानाना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची लातूर जिल्हा ही जन्मभूमी नसली तरी त्यांची कर्मभूमी होती, त्यांचेही योगदान आणि त्याची आठवण या निमित्ताने ठेवावी लागेल, असे फडणवीस म्हणाले होते. लातूर महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे स्वबळावर लढत आहेत. अशावेळी अजित पवारांनी विलासराव देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसने आमदारांची संख्या जास्त असताना मुख्यमंत्री केले होते याची आठवण अजित पवारांनी काँग्रेसला करून दिल्याने अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.