अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांनी एकत्र येण्याची भाषा केली असली तरी, पडद्यामागे दोघांकडून वेगळ्याच हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
जालना जिल्ह्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या हालचालींना विशेष महत्त्व.
राजकीय समीकरणे बदलण्यासाठी दोन्ही नेते स्वतंत्र रणनीती आखत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Local Body Election 2025 : नगर परिषदेचे रूपांतर महापालिकेत झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत महापौर पद पटकावण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. जिल्हा परिषद, महापालिका नगरपरिषद, पंचायत समिती या निवडणुका युती म्हणून लढाव्यात असा प्रस्ताव शिवसेनेचे आमदार तथा नेते अर्जुन खोतकर यांनी भाजपाकडे दिला आहे. मात्र यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर झालेल्या दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमात महायुतीचे सर्व नेते एकाच व्यासपीठावर जमले होते.
या कार्यक्रमात अर्जुन खोतकर यांनी पुन्हा युतीसाठी भाजपकडे हात पुढे केला. यावेळी केलेल्या भाषणात कैलास गोरंट्याल, रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर या नेत्यांनी एकमेकांना टोले लगावले. मात्र कुठल्याही परिस्थितीत युती झाली पाहिजे अशी भावना खोतकर आणि दानवे यांनी व्यक्त केली. जाहीर कार्यक्रमात युतीची भाषा शिवसेना आणि भाजपचे नेते करत असले तरी पडद्यामागे मात्र वेगळ्याच हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.
शिवसेनेचा प्रस्ताव वेटिंगवर ठेवून भाजपने स्वबळाची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. विशेषत: कैलास गोरंट्याल हे शिवसेनेसोबत कुठल्याही परिस्थितीत युती करण्यास उत्सुक नाहीत. भाजप पक्षप्रवेशावेळीच मुख्यमंत्री व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना कैलास गोरंट्याल यांनी महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढा, मी महापौर आणि भाजपचे सगळे नगरसेवक निवडून आणतो, असा शब्द दिला होता. ते या शब्दावर अजूनही ठाम आहेत. त्यामुळे रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांनी युतीची तयारी दर्शवली असली तरी कैलास गोरंट्याल ही युती होऊ देणार नाही, असे बोलले जाते.
अर्जुन खोतकर यांनी दिवाळी स्नेह मेळाव्यात युतीसाठी तुम्ही सांगाल ते करू, आमची तयारी आहे असे म्हणत आवाहन केले. तर रावसाहेब दानवे यांनी मी तुमच्या सगळ्यांच्या प्रचाराला फुकटात येईन असे सांगत आपली युतीची तयारी असल्याचे संकेत दिले. खोतकर यांच्या प्रस्तावाला भाजपकडून कुठलाच प्रतिसाद अद्याप तरी मिळालेला नाही. त्यामुळे शिवसेनेने स्वबळाची तयारी सुरू केली आहे.
अर्जुन खोतकर यांनी महापौर पदाच्या उमेदवाराची ओळखच या मेळाव्यात महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना करून दिली. मात्र युती झाली तर योग्य सन्मानासह तडजोडीची आपली तयारी असल्याचेही खोतकर यांनी संभाव्य महापौरपदाच्या उमेदवाराकडून वदवून घेतले. यावरून अर्जुन खोतकर हे युतीसाठी आग्रही असल्याचे दिसून आले. मात्र भाजपकडून शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी चकवा दिला जाऊ शकतो, अशी एकंदरीत परिस्थिती आहे.
मदतीची करून दिली जाणीव
अर्जुन खोतकर यांनी भाजपचे महानगराध्यक्ष भास्कर पाटील दानवे यांना गेल्यावेळी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्या, अशी मागणी आपण रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती. मात्र ते का होऊ शकले नाही? हे मला माहित नाही,असे सांगत एकमेकांना केलेल्या मदतीची जाणीव करून दिली. त्याला रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात टोलेबाजीतून उत्तर दिले.
महायुती म्हणून एकत्र लढायचे असेल तर सायकलच्या चाकाची हवा जशी तपासावी लागते, कुठे पंचर असले तर ते काढावे लागते. याशिवाय टायरमध्ये कुठे काही काटा गुंतलेला आहे का? हे हात लावून तपासावे लागते. तसेच युतीच्या आधी आपल्याला सगळी परिस्थिती तपासून घ्यावी लागेल, असे म्हणत टोलेबाजी केली. महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी युती संदर्भात निर्णय घ्यावा मी सगळ्यांच्या प्रचाराला फुकट येईल, माझं ते कामच आहे, असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी युतीचा निर्णय स्थानिक नेत्यांच्या माथी मारला.
भाजपचे महानगराध्यक्ष भास्कर पाटील दानवे एकीकडे युतीचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे सांगत आहेत. तर रावसाहेब दानवे यांनी मात्र स्थानिक नेत्यांनी निर्णय घ्यावा, असे म्हणत हात झटकले. एकूणच युतीचे गुऱ्हाळ लांबत चालल्याने दोन्ही पक्ष स्वबळावरच लढतील, अशी चर्चा आता जालन्याच्या राजकारणात रंगू लागली आहे.
1. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे खरोखर एकत्र येणार आहेत का?
अधिकृत घोषणा नाही, पण दोघांनी एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.
2. पडद्यामागे कोणत्या हालचाली सुरू आहेत?
दोघेही स्थानिक पातळीवर स्वतंत्र गटबांधणी आणि नेत्यांशी संपर्क साधत आहेत.
3. जालना जिल्ह्याच्या राजकारणात या हालचालींचा काय परिणाम होईल?
या दोघांच्या समीकरणामुळे शिवसेना आणि भाजपच्या संघटनांवर मोठा परिणाम होऊ शकतो.
4. ही हालचाल निवडणुकीपूर्व तयारी आहे का?
होय, आगामी निवडणुकांच्या रणनीतीचा हा भाग असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
5. खोतकर आणि दानवे यांची एकत्र येण्याची भाषा कोणत्या कारणासाठी केली गेली?
प्रदेशातील राजकीय समतोल राखण्यासाठी आणि विरोधकांना संदेश देण्यासाठी ही भूमिका घेतल्याचे मानले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.