Jalna Political News : जालना जिल्ह्यातील राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांनी आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नवी समीकरण जुळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गोरंट्याल यांचा भाजपा प्रवेश हा अर्जुन खोतकर यांना रोखण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी करवून घेतला हे आता लपून राहिलेले नाही.
गोरंट्याल-दानवे यांनी केलेली ही कोंडी फोडण्यासाठी आता अर्जुन खोतकर यांनीही अनेक वर्ष एकाच पक्षात काम केलेल्या आणि आता वेगवेगळ्या पक्षात असलेल्या जुन्या मित्रांना साद घालायला सुरूवात केली आहे. कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने ऐनवेळी अडचणीत सापडलेल्या (Congress) काँग्रेसचीही मदत येणाऱ्या निवडणुकीत अर्जुन खोतकर छुप्या पद्धतीने मिळवण्याच्या तयारीत आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. या निमित्ताने खासदार कल्याण काळे (Kalyan Kale) ,आमदार अर्जुन खोतकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या आजारी आईची देखील या नेत्यांनी भेट घेतली. वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि सुखा-दुःखाच्या प्रसंगातील भेटीचे राजकारण केले जाऊ नये. अनेक राजकीय नेते हे कोणत्या पक्षात असले तरी एकमेकांचे हित व वैयक्तिक संबध जोपासत असतात.
भास्कर आंबेकर आणि अर्जुन खोतकर हे तर गेली अनेक वर्ष सोबत काम करत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तर भास्कर आंबेकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले. त्यांच्या निष्ठेची चर्चा आजही जिल्ह्याच्या राजकारणात होते. लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे कल्याण काळे खासदार झाले. त्यामुळे जालना जिल्ह्यात काँग्रेसला अच्छे दिन आले, असे चित्र निर्माण झाले.
परंतु विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी थेट भाजपात प्रवेश करत पक्षाला ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आणले. पक्षाने विधानसभा निवडणुकीत साथ दिली नाही, विद्यमान आमदार असताना उमेदवाराच्या तिसऱ्या यादीत माझे नाव आले, नेत्यांनी सभा दिल्या नाही, मला वाऱ्यावर सोडले असे, आरोप गोरंट्याल यांनी पक्ष सोडण्याची कारणं देतांना केले. मात्र नगरपरिषदेचे रुपांतर महापालिकेत झाल्यानंतर विरोधी पक्षात राहून सत्तेत जाता येणार नाही. शिवाय कट्टर राजकीय विरोधक अर्जुन खोतकर हे आमदार झाल्याने त्यांना रोखायचे असेल तर सत्ताधारी पक्षच हवा हे त्यांनी हेरले.
शिवाय माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही लोकसभा निवडणुकीत खोतकरांनी विरोधात केलेल्या कामाचा वचपा काढायचा होता. गोरंट्याल यांना भाजपामध्ये प्रवेश देत दानवे यांनी हे काम केले. खोतकर-दानवे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने महापालिका निवडणुकीत मोठा संघर्ष उफाळणार याचा ट्रेलर सध्या जालनेकरांना पहायला मिळतो आहे. अशावेळी अर्जुन खोतकर यांनी खासदार कल्याण काळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्याशी जवळीक वाढवत आपला बी प्लान आखल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.