
हिंगोली : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या 'भारत जोडो यात्रे'मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. भगव्या फेट्यांसह रस्त्यावरील दुतर्फा रांग असो की, आखाडा बाळापूरमध्ये लाल मातीत रंगलेला कुस्त्यांचा फड असो, कोल्हापुरकरांनी हिंगोलीत जाऊन केलेले स्वागत 'नाद' खुळा असेच होते. अर्थातच, आजच्या दिवसाचा केंद्रबिंदू हाच प्रसंग ठरला. यावेळी शिवकालीन पारंपरिक खेळांनीही लक्ष वेधले.
भारत जोडो यात्रेच्या ६६ व्या दिवशी व महाराष्ट्रातल्या ६ व्या दिवशी कळमनुरी तालुक्यातील दाती पाटी येथून यात्रा सुरु झाली. तासभराने यात्रा जेव्हा आखाडा बाळापूर या ठिकाणी पोहचली, तेव्हा राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी सहाशे किलोमीटर दूरवरुन आलेल्या कोल्हापूर येथील तब्बल पाच हजार कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. शनिवारी पहाटे साडेपाच वाजताच ते स्वागतस्थळी येऊन थांबले होते.
पदयात्रेत राहुल गांधी यांचे लक्ष कुस्तीच्या आखाड्याकडे गेल्यावर, सहाजिकच त्यांची पावले तिकडे वळली. झेड प्लस सुरक्षा व्यवस्था भेदून त्यांनी कोल्हापूरहून आलेल्या मल्लांना भेटले. राहुल गांधी यांच्या हस्ते एक कुस्ती लावण्यात आली. पैलवानांनी देखील शड्डू ठोकत सुरवात केली. यावेळी कुस्तीतला प्रत्येक डाव त्यांनी निरखून पाहिला. त्यांच्या निरीक्षणाचेही कोल्हापूरकरांना अप्रुप वाटले.
राहुल गांधी यांच्यासोबत कोल्हापूरकर आठ ते दहा किलोमीटर पदयात्रेत चालले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील, राजीव आवळे, ऋतुराज पाटील, पलुस कडेगावचे आमदार विश्वजीत कदम, आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत भाग घेत चर्चा केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.