

BJP Politics News : भाजपचे नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्वतःच्या नावावर असलेली 39 एकर शेत जमीन ही आपल्या नातेवाईकांना फुकटात वाटून दिली. भाऊबंदकीत बांधावरून वाद, एकमेकांचे खून पाडल्याची राज्यात अनेक उदाहरणं असताना रावसाहेब दानवे यांनी मात्र एकोणचाळीस एकर जमीनीवर पाणी सोडत ती नातेवाईकांना वाटून देत त्यांच्या नावाचे सातबारे हवाली केले. याची राजकीय वर्तुळाच चर्चा सुरू असतानाच भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने यावरून सिल्लोडचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला.
एकीकडे त्याग तर दुसरीकडे गोरगरिबांच्या जमीनी बळकावण्याचा प्रकार, असे म्हणत भाजपचे नगरसेवक कमलेश कटारिया यांनी रावसाहबे दानवे यांचे कौतुक करताना अब्दुल सत्तार यांच्यावर ते सिल्लोड शहरात दहशतीच्या जोरावर गोरगरिबांच्या जमीन बळकावत असल्याचा आरोप करत हल्लाबोल केला. दुसरीकडे आमचे नेते रावसाहेब दानवे हे मात्र आपल्या मालकीची कित्येक एकर जमीन नातेवाईकांच्या नावावर करतात, ती ही फुकट हाच तुमच्या आणि आमच्या नेत्यामधील संस्काराचा फरक असल्याचा टोलाही कटारिया यांनी लगावला.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतील निकालानंतर शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली होती. ज्यांना आपली नगरपालिका सांभाळता येत नाही, ते देशाचे नेते कसे होऊ शकतात? आम्ही तुमचा भोकरदन आणि फुलंब्रीतही खेळ बिघडवला, असे म्हणत डिवचले होते. दानवे यांनी मात्र या टीकेला उत्तर देताना हा अब्दुल सत्तारांचा नाही तर समाजीक समीकरणांचा विजय असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, भाजपचे सिल्लोड नगर परिषदेतील नगरसेवक कमलेश कटारिया यांनी रावसाहेब दानवे यांनी 39 एकर जमीन नातेवाईकांना फुकटात वाटून दिल्याच्या घटनेचा उल्लेख करत अब्दुल सत्तार यांच्यावर तुटून पडले. आमचा नेता वडिलोपार्जित जमीन दान करतो, तर सिल्लोडचे तथाकथित नेते सत्तेच्या बळावर गरीबांच्या जमिनी बळकावतात. दान आणि दडपशाही यातलाच हा संस्कारांचा फरक आहे, अशी खरमरीत टीका कटारिया यांनी सत्तार यांच्यावर केली आहे.
नुकत्याच झालेल्या सिल्लोड नगरपरिषद निवडणुकीत सत्तार यांना एकहाती सत्ता मिळाली असली, तरी भाजपचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकीच एक असलेले कमलेश कटारिया. कट्टर हिंदुत्ववादी आणि रावसाहेब दानवे यांचे समर्थक ते ओळखले जातात. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील लेंभेवाडी येथील आपली वडिलोपार्जित 39 एकर जमीन कोणताही मोबदला न घेता रावसाहेब दानवे यांनी नातेवाईकांच्या नावावर हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला.
जिथे शेतजमिनीच्या बांधावरून भावा-भावांत वर्षानुवर्षे कोर्ट-कचेऱ्या सुरू असतात, तिथे दानवेंनी दिलेला हा निर्णय गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. या निर्णयाबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार आणि स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. याची जिल्ह्यात चर्चा सुरू असतानाच भाजप पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांना डिवचण्याची संधी सोडली नाही. 'दानवे दान करतात, सत्तार जमीन बळकावतात', अशी थेट टीका केली जात आहे.
भाजप कार्यकर्त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सिल्लोडमधील राजकीय संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. एकीकडे दान, त्याग आणि संस्कारांचे राजकारण, तर दुसरीकडे सत्तेच्या जोरावर वर्चस्व गाजवण्याचे आरोप. या दोन टोकांवर उभ्या असलेल्या दानवे आणि सत्तार यांच्यातील संघर्ष आता कमलेश कटारिया यांच्या माध्यमातून नव्या टप्प्यात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.