अंबादास दानवे यांनी भाजपवर आरोप करत विचारले की सामान्य कार्यकर्त्यांना संधी न देता नातेवाईकच बिनविरोध का निवडून येतात?
त्यांनी भाजपमध्ये सुरू असलेल्या कथित घराणेशाही आणि अंतर्गत राजकारणावर जोरदार टीका केली.
हा मुद्दा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
Shivsena UBT News : भाजपला सत्तेचा माज चढला आहे, प्रचंड दबावतंत्र आणि प्रशासनाचा गैरवापर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सुरू आहे. शंभर उमेदवार अन् अनेक नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आल्याचा दावा त्यांचे नेते, प्रवक्ते करत आहेत. मुळात हा विजय नाही तर भाजप नेत्यांचा आणि या पक्षाचा माज आहे. सगळ्या नेत्यांचे नातेवाईकच बिनविरोध कसे निवडून येतात? एखादा सामान्य कार्यकर्ता उमेदवार नगराध्यक्ष किंवा नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून का येत नाही? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
राज्यातील विविध घडामोडींवर अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भाजपच्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांची वाटचाल शतकाकडे जात असल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अभिनंदन केले आहे. या संदर्भात प्रश्न केला असता अंबादास दानवे यांनी भाजपला सत्तेचा माज चढला असल्याची टीका केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जाहीर भाषणातून आम्हाला मदत करा, विकास निधी देऊ असे सागंत असल्याचा आरोप करत ही सौदेबाजी असल्याचे दानवे म्हणाले. मला वाटते ही सौदाबाजी किंवा धमकी आहे. निधी अजित पवार यांच्या घरचा नाही. निधी करातून येतो, घरातून येत नाही. अजित पवार मतांसाठी धमकी देत असतील तर निवडणूक आयोग काय करत आहे? असा संताप त्यांनी व्यक्त केला.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत स्वतंत्र जाऊ पाहत आहे, याकडे लक्ष वेधले असता कोणाची तरी जिरवायची आहे म्हणून त्यासाठी आपल्यात विभाजन होऊ नये, अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे म्हटले. ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मतदार यादीत प्रचंड घोळ असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. हजारो ठिकाणी वार्ड रचनेत गोंधळ आहे. वार्ड रचना करून वार्ड बाहेरील मतदार येतात कसे? सर्वच ठिकाणी अशीच बोंब आहे.मुंबई, ठाणे, पुणे अनेक ठिकाणी असेच घडले आहे. निवडणूक आयोग म्हणत आहे एखाद्या व्यक्तीने तक्रार करावी. प्रचंड गोधळ मतदार यादीत असून, आम्ही तक्रार करणार आहोत असे अंबादास दानवे म्हणाले.
शिंदेंची शिवसेना फुटणार?
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री, आमदार भाजपमध्ये जाणार का? या प्रश्नाला उत्तर देताना दानवे म्हणाले, आत्ताच्या घडीला शिंदे यांचे कित्येक मंत्री ऐकत नाही, त्यांना फडणवीस ऑपरेटिंग करत आहेत. उदय सामंत अशा मंत्र्यांना लीड करत आहेत. आज नाहीतर उद्या हे लोक भाजपमध्ये जाणार आहेत, असा दावा करतानाच गद्दारांना पुन्हा आमच्याकडे प्रवेश नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाईचे अनुदान मिळालेले नाही. 40 टक्के लोकांना नुकसानभरपाई आली असेल, पण जी जाहीर झाली ती अजून आलेली नाही. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या फसव्या पॅकेज आणि आश्वासनांचा पंचनामा करणार आहोत, असेही दानवे म्हणाले.
दानवे यांनी म्हटले की भाजप नेते आपल्या नातेवाईकांना बिनविरोध निवडून आणत आहेत आणि सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली जात नाही.
होय, त्यांनी थेटपणे घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये झालेल्या बिनविरोध निवडींवरून हा वाद निर्माण झाला आहे.
लेखनाच्या वेळेस कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
यावरून शिवसेना–भाजप संघर्ष वाढण्याची शक्यता असून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीही वाढू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.