

Chhatrapati Sambhajinagar municipal election : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर असलेल्या असुविधेवरून, 'AIMIM'चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केलं.
तसंच राज्यात सत्ताधाऱ्यांच्या राडेबाजीवर बोलताना, निवडणुकीच्या निकालानंतर आता, 16 तारखेला हे सत्ताधारी पुन्हा मांडीवर मांडी घालून एकत्र येतील, असा टोलाही जलील यांनी लगावला.
राज्यात 29 महापालिकेसाठी आज मतदान होत आहे. अनेक ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी आहेत. काही मतदारांना मतदान यादीत नाव नसल्यावरून गोंधळ उडाला आहे. मतदान (Vote) केंद्र सापडत नसल्याच्या तक्रारी आहेत. मतदान केंद्रावर सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी आहेत. याचाच अनुभव छत्रपती संभाजीनगरमधील 'AIMIM'चे माजी खासदार इम्तियाज जलील यांना आला. यावर त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला.
इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले, "महापालिकेसाठी तब्बल दहा-एक वर्षानंतर मतदान होत आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार, प्रशासन आणि निवडणूक आयोगाकडून अपेक्षा आहे की, जास्तीत जास्त सुविधांच्या अपेक्षा होती. विशेष म्हणजे पहिल्यांदा पॅनल सिस्टममध्ये मतदान होत आहे. पॅनल सिस्टममध्ये चार जणांना मतदान करायचे असते. वयोवृद्धांना हे मतदान करताना चांगली प्रकाश सुविधा अपेक्षित आहे. बसण्याची, पाण्याची सुविधा आवश्यक आहे. तसेच मतदान केंद्रांवर कोणता कक्ष हे साधे लिहिलेले नाही."
'मतदान कक्षावर साधारण नंबर सुद्धा लिहिलेले नाही, आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला शोधाशोध करावी लागली. इतकं बेसिक सुविधा नाहीत, याची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी होती. कक्ष क्रमांक दिले नसल्याची तक्रार केल्यानंतर आता धावपळ करत क्रमांक लावले जात आहेत. तपासणीसाठी वरिष्ठ अधिकारी आले होते त्यांच्याही लक्षात आलं नाही का?' असा सवाल इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला.
ईव्हीएम मशीनमध्ये तुमच्या पक्षाचा चिन्ह तुम्हाला दिसलं का? यावर इम्तियाज जलील म्हटले की, 'मला रात्री झोपेत सुद्धा माझ्या पक्षाचं चिन्ह दिसतं. कारण काल मकर संक्रांती दिवसभर साजरी केली. खूप जोरात साजरी केली.'
मतदानाच्या एक दिवस अगोदर मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये राडेबाजी झाली, मारामाऱ्या झाल्या, आरोप-प्रत्यारोप झाले, यावर बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, "खूप खालच्या लेवलला हे इलेक्शन होत आहे. येणाऱ्या काळामध्ये लोकांचा विश्वास इलेक्ट्रोल मतदानावर आणि लोकशाही वरील संपेल, अशी भीती वाटू लागली आहे." सत्ताधारीच एकमेकांवर गंभीर आरोप करत होते. आता तेच सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. निवडणूक आल्यावर फक्त वेगळं होतात. उद्या 16 तारखेला निकालानंतर हे पुन्हा एकमेकांच्या मांडीवर मांडी देऊन बसतील, असा टोला इम्तियाज जलील यांनी लगावला.
इम्तियाज जलील यांनी केलेल्या मतदानाच्या ठिकाणी त्यांच्या पक्षाचे दोन उमेदवार आहेत, पण चार ठिकाणी मतदान करायचे होते. मग इम्तियाज जलील यांनी उर्वरीत दोन मतदान कोणाला केलं, यावर त्यांनी खुबीनी उत्तर दिलं. "माझ्या प्रभागांमध्ये कोण चांगला माणूस आहे हे, मला चांगलं माहित आहे. माझे दोन उमेदवार आणि उर्वरित दोन उमेदवार, कोणाला मतदान केलेलं आहे हे, मला आता विचारू नका. पण चारही मतदान केलं आहे," असे इम्तियाज जलील यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.