Dharashiv News : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरु आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच नेतेमंडळी प्रचारात व्यस्त आहेत. त्यातच तीनच दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून धाराशिव लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झालेल्या अर्चना पाटील यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा जोरात रंगली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने येत्या काळात त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ 'सरकारनामा'च्या हाती आला आहे. या व्हिडिओमुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत सापडले आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील येत असलेल्या बार्शी विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी व देवदर्शनासाठी गेलेल्या उमेदवार अर्चना पाटील यांना माध्यम प्रतिनिधीने, 'बार्शीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा फारसा प्रभाव दिसत नसताना येथे पक्षाचे वर्चस्व कसे वाढवणार?' अशी विचारणा केली असता, 'मी कशाला वाढवू? मला तर काही कळतच नाही. मी महायुतीची उमेदवार आहे. मी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आणि एनडीए ४०० पार करण्यासाठी निवडणूक लढवत आहे', हे वक्तव्य तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करून धाराशिवची उमेदवारी मिळवलेल्या अर्चना पाटील यांचे. (Dharashiv Loksabha Election 2024 News)
मुंबईत ४ एप्रिलला अर्चना पाटील यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. त्यानंतर राष्ट्रवादीचे (Ncp) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी अर्चना पाटील यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर रविवारी अर्चना पाटील बार्शीमध्ये आल्या असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली.
याचवेळी आमदार राजेंद्र राऊत यांच्याविषयी बोलताना अर्चना पाटील म्हणाल्या, “राजेंद्र राऊत महायुतीचे घटक आहेत. माझे पती स्वत: भाजपचे आमदार आहेत. मला त्यांनी येथून तिकीट दिलं आहे. मी येथे भगवंताच्या दर्शनासाठी आले आहे. मी निवडून येणार आहे. राजेंद्र राऊत यांचा मला भावासारखा पाठिंबा आहे, असेही त्या म्हणाल्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा)
धाराशिव मतदारसंघात राणा जगजितसिंह पाटील व ओमराजे निंबाळकर या दोन कुटुंबांमध्ये जिल्ह्यात नेहमीच चढाओढ पाहायला मिळाली आहे.धाराशिव मतदारसंघात ठाकरे गटाकडून खासदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
त्यांच्याविरोधात निवडणूक लढण्यासाठी राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघात पाटील विरुद्ध निंबाळकर हा परंपरागत लढत होणार असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या संदर्भात त्यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.