

Parbhani News : परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या शिवसेना प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यादाच परभणी दौऱ्यावर येत आहेत. प्रकृती बरी नसल्यामुळे स्थगित करण्यात आलेला शेतकरी मेळावा 30 ऑगस्ट रोजी होत आहे. जाधव यांनी ही माहिती माध्यमांना दिली. परभणी शहरातील स्टेडियम मैदानावर सकाळी अकरा वाजता शिंदे हे शेतकरी व शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
परभणी जिल्ह्यातील रखडलेल्या विकासकामांसह नवीन विकासकामांबाबतही यावेळी शिवसेनेचे खासदार संजय जाधव भूमिका मांडणार आहेत. या संवाद मेळाव्याला जिल्ह्यातील हजारो शेतकरी उपस्थित राहणार आहेत. प्रतिष्ठित व्यापारी, डॉक्टर, वकील आणि नागरिकांशीही उपमुख्यमंत्री शिंदे संवाद साधणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र वेळ निश्चित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अनेक प्रलंबित विकासकामांना गती देण्याबरोबरच नवीन विकासकामांना मंजूरी मिळवून ती मार्गी लावण्यासाठी दौऱ्यादरम्यान प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. परभणी महापालिकेच्या जीएसटी निधीच्या प्रश्नावरही मंगळवारी निर्णय होणार असल्याचे खासदार जाधव यांनी सांगितले.
या निर्णयानंतर महापालिका कर्मचाऱ्यांचे सुरू असलेले आंदोलन लवकरच संपेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून संवाद मेळाव्याच्या तयारीला सुरवात करण्यात आली असून, मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, पत्रकरांनी जाधव यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात तुम्हाला मंत्री पद मिळेल का? असा प्रश्न केला. यावर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मला माहिती नाही, मोदी साहेबांना विचारा, केंद्राने विस्तार कधी करावा हे भाजपाचे नेते ठरवतील. केंद्राने विस्तार ठरवला आणि माझ्या पक्षाने माझे नाव सुचवले तर मला संधी मिळेल.
नाही सुचवलं तरी मी चिंता करत नाही. मला संधी मिळण्याचे चान्सेस शंभर टक्के आहेत, असे मला वाटते, असेही जाधव म्हणाले. आम्ही शिवसेनेत गेलेल्या सगळ्या खासदारांना मंत्री व्हावेसे वाटते, ओमराजे, बारणेआप्पा अशी अनेक नावे आहेत. तसेच मलाही मंत्री व्हावेसे वाटणे साहजिक आहे. मात्र द्यायचे का नाही द्यायचे हे नेत्याच्या हातात असते, असे जाधव म्हणाले.
आम्हाला नोटीस आल्याचा विषय पार्टी बघेल, पार्टीने वकील लावलेले आहेत, त्यांना नोटीस दिली असेल तर मलाही आली असेल. मात्र, जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला तेव्हा या सगळ्या गोष्टींना तोंड देण्याचा विचार करूनच घेतलेला आहे, असे जाधव यांनी स्पष्ट केले.