
Dharashiv News : राज्यात महायुतीचे सरकार येऊन चार महिन्याचा कालावधी झाला आहे. मात्र, सत्तास्थापनेच्या सुरुवातीपासून महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या-ना त्या कारणाने वाद रंगलेला दिसत आहे. सुरुवातीला मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच होती. त्यानंतर गृहमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे असून बसले होते तर त्यानंतर वाढीव मंत्रीपदावरून तीनही पक्षांत चुरस होती. हे सर्व वाद मिटून शपथविधी पार पडल्यानंतर पालकमंत्रिपदावरून तीन ही पक्षात चांगलीच जुंपली होती.
पालकमंत्रिपदाची नियुक्ती होऊन दोन महिने उलटले तरी नाशिक, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद मिटलेला नाही. त्यातच आता धाराशिवमध्येही पालकमंत्रीपदावरुन भाजप व शिवसेनेत (Shivsena) वाद रंगला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना धाराशिवच्या पालकमंत्री पदावरुन हटवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याने केल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या काळात पालकमंत्री प्रताप सरनाईकांची बदनामी न थांबवल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वतंत्र लढवणार असल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे.
धाराशिवचे पालकमंत्रिपद सुरुवातीपासून शिवसेनेच्या वाट्याला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना धाराशिवचे पालकमंत्रीपद सोपवले आहे. मात्र, गेल्या काही दिवसातील घटना घडामोडी पाहता प्रताप सरनाईक यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न मित्र पक्ष असलेल्या भाजपकडून सुरु आहे.
नुकत्याच झालेल्या डीपीडीसी बैठकीत 268 कोटी रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले होते. या 268 कोटी रुपयांच्या निधी वाटपाला अचानक मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थगिती दिली होती. धाराशिव जिल्ह्याचा विकास निधी मुख्यमंत्री यांच्या आदेशाने थांबवण्यात आला आहे. यावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद पेटला आहे. त्यामुळेच महायुतीमधील तीन पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे दिसत आहे.
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरुन भाजप-शिंदेंच्या शिवसेनेत वाद सुरू झाला आहे. हा वाद केवळ पाल्कमंत्री बदलण्यासाठीचे भाजपचे षड्यंत्र असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी केला आहे. पाटील यांनी भाजपवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे येत्या काळात यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे
येत्या काळात पालकमंत्री प्रताप सरनाईकांची बदनामी न थांबवल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वतंत्र लढवणार असल्याचा इशारा देखील सुधीर पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या काळत यावरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात या वादावर महायुतीचे नेते कशा प्रकारे तोडगा काढणार याकडे लक्ष लागले आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.