Ajit Pawar Meeting News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि त्यानंतर झालेल्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. ज्या अमानूषपणे संतोष देशमुख यांचे हाल करून त्यांना संपवण्यात आले, त्याची छायाचित्रं समोर आल्यावर तर राज्यात संतापाची लाट उसळली होती. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले व इतरांवर कारवाईचा फास आवळला गेलायं. धनंजय मुंडे यांच्या जवळची ही माणसे असल्याने त्यांनाही मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.
या संपूर्ण प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या सातत्याने सक्रीय होत्या. बीज जिल्ह्यातील जातीयवाद, शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीत बिंदूनामावलीचा नियम पायदळी तुडवून कशा एकाच समाजाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या याची यादीच दमानिया यांनी सोशल मिडियावर व्हायरल केली होती. विशेषतः धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात हा प्रकार कसा सर्रासपणे घडला हे दमानिया (Anjali Damania) यांनी समोर आणले होते.
विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या अगदी शेवटच्या दिवशी बीडचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या मुद्याला हात घातला. या संदर्भात त्यांनी मंत्रालयात बैठक घेऊन आढावा घेतला. दरम्यान, बीडचे पोलीस अधीक्षक नवीनत कावत यांनीही बीड पोलीस दलात जातीयवाद असल्याचे मान्य करत पोलीस कार्यालयात प्रत्येकांनी एकमेकांना फक्त नावानेच बोलायचे, आडनावाचा उल्लेख करायचा नाही, असा निर्णय घेतला होता.
याशिवाय पोलीस गणवेशावरील नेमप्लेटवर देखील फक्त संबंधिताच्या नावाचा उल्लेख करण्याचा उपक्रम सुरु केला. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमध्ये बिंदूनामावलीचे नियम पाळले गेलेत की नाही? याचा आढावा अजित पवार यांनी काल घेतला. मंत्रालयातील दालनात बीड जिल्ह्यातील बिंदूनामावलीनुसार शासकीय कर्मचारी यांच्या नियुक्ती बाबत बैठक घेण्यात आली. या नियुक्ती संदर्भात बैठक व्हावी, अशी मागणी भाजपाचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांनीही केली होती.
या आयोजित बैठकीच्या निमित्ताने बिंदूनामावली संदर्भात महत्वाच्या गोष्टी या लोकप्रतिनिधींनी सर्वांच्या निदर्शनास आणून दिल्या. बीड जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांतर्गत येणारी पदभरती ही बिंदूनामावलीनुसार करण्यात येते. पदभरतीसाठी मागणी पत्र पाठवण्यापूर्वी संबंधित प्रशासकीय विभाग अथवा नियुक्तीसाठी बदलीने / प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी बिंदूनामावली चा वापर केला जात नाही, असे मुद्दे मांडण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांनी एका महिन्यात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बिंदूनामावलीची चौकशी करण्याचे आदेश दिले.
तसेच सर्व प्रशासकीय विभागातील अधिकारी / कर्मचारी यांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळेल यासाठी स्वतंत्र धोरण ठरविण्याबाबत निर्णय घेतला. हा निर्णय स्वागतार्ह असून या बैठकीत जिल्ह्याच्या अनुषंगाने महत्वाच्या असणाऱ्या इतरही मुद्यांवर चर्चा करण्यात आली. आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, ग्रामविकास सचिव एकनाथ डवले आंदीची या बैठकीला उपस्थिती होती.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.