
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याचा सस्पेंस कायम असतांना भाजपचे नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री कोण होणार, ते नाव ठरलेलं आहे. राज्यातील जनतेलाही याची कल्पना आहे. फक्त त्या नावावर स्टॅंम्पिंग व्हायचे बाकी आहे, असे सांगत दानवे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य करत उत्सूकता वाढवली आहे. माध्यमांकडून राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत प्रश्न विचारला तेव्हा दानवे यांनी स्पष्ट केले, की मुख्यमंत्री कोण होणार? याची स्क्रीप्ट तयार आहे.
आमच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यावर स्टॅम्पिंग झाले की ते नाव महाराष्ट्रासमोर येईलच. राज्यातील जनतेलाही मुख्यमंत्री कोण होणार? हे माहित आहे, जनता कन्फ्यूज नाही, माध्यमे कन्फ्यूज आहेत, असा टोलाही दानवे यांनी लगावला. (BJP) भाजपमध्ये कामाची एक पद्धत आहे, त्यानूसार सगळी आखणी सुरू आहे, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. येत्या पाच तारखेला भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री शपथ घेणार आहे. आधी विधिमंडळ पक्षाची बैठक होईल त्यात सर्वानुमते नेता निवडला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल.
जसं ठरलं तसचं सुरू आहे कोणताही वाद आमच्यात नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले. प्रसंग, वेळ पाहून आम्ही सगळं करत असतो वेळही ठरवली आहे, तारीखही ठरवली आहे, असे दानवे म्हणाले. (Raosaheb Danve) अमूक नेत्याला मुख्यमंत्री करा म्हणून रक्ताने पत्र लिहिली जात आहेत, याकडे दानवे यांचे लक्ष वेधले. यावर कार्यकर्ते उत्साही असतात, त्यातून अनेक गोष्टी ते करत असतात त्याला आमची मान्यता नसते. रक्ताने पत्र लिहिण्याने कोणी मुख्यमंत्री होत नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे नाराज आहेत का?
या प्रश्नावर बिलकुल नाराज नाहीत केवळ वर्तमानपत्र आणि चॅनलला चाललेली ती बातमी आहे. ते स्वतःच्या गावी गेले आहेत शंका उपस्थित करण्याचा प्रश्न नाही. त्यांना ताप आलाय आरामाचा सल्ला दिलाय त्याच्यावर देखील शंका उपस्थित केली जाते आहे. संजय राऊत म्हणतात त्यांचा चेहरा पडला पण हे सारेच पडलं तरी आम्ही त्यांच्याबद्दल बोलत नाही, असा चिमटाही दानवे यांनी काढला. संजय राऊत यांना रुग्णालयात ऍडमिट करण्याची गरज आहे, असेही दानवे म्हणाले.
ते जे जे बोलतात ते खोटं ठरलं त्यांच्या वागण्यामुळे शिवसेना फुटली आता ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्ये भांडण लावत आहेत, असा आरोप दानवे यांनी केला. भाजप शिवसेना एकत्र राहिली असती तर यापेक्षा जास्त बहुमत मिळाले असते. उद्धव ठाकरे यांची वाट भरकटवली, जर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यामध्ये भांडण झाले तर कारण संजय राऊत असतील, असे दानवे यांनी सांगितले.
विधिमंडळ गटनेता पाच तारखेच्या अगोदर निवडला जाईल. शिवसेना जर काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत गेली नसती तर 14 ते 19 पर्यंत सारखाच कारभार झाला असता आणि त्या कारभाराच्या आधारावर याहून अधिक जागा आल्या असत्या. उद्धव ठाकरे सोबत असते तर आज जेवढं बहुमत मिळाले त्यापेक्षा जास्त बहुमत मिळाले असते, याचा पुनरुच्चार रावसाहेब दानवे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.