

Marathwada Railway News : राम काळगे
मराठवाडा आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा आणि व्यापार, उद्योगांसाठी पूरक अशा कलबुर्गी-लातूर या उमरगा, औसा मार्गे जाणाऱ्या रेल्वे मार्गाला आता वेग आला आहे. तब्बल पाच हजार कोटी रुपयांचा हा मार्ग लवकर हाती घ्यावा, यासाठी कर्नाटकातील कलबुर्गी लोकसभा मतदारसंघाचे खासदार राधाकृष्ण, लातूरचे काँग्रेस खासदार शिवाजी काळगे आणि धाराशिवचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
कलबुर्गी–लातूर रेल्वेमार्गासाठी निर्णायक हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या सहमतीची प्रतीक्षा असून, हा रेल्वे मार्ग कलबुर्गी, उमरगा, लामजना मार्गे औसा जावा व त्याला लवकर मंजुरी देऊन काम पूर्ण करावे, यासाठी लातूर, धाराशिव व गुलबर्गा येथील या तिन्ही खासदारांनी लेखी शिफारस केली आहे. त्यामुळे आता या कामाला गती येणार असून, राज्य सरकार त्यांचा वाटा व त्या रकमेची तरतूद कधी करणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, हा रेल्वे मार्ग लवकर मार्गी लागावा, यासाठी कलबुर्गीचे खासदार राधाकृष्ण यांनी 16 जुलै रोजी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. तर खासदार शिवाजी काळगे, ओमराजे निंबाळकर यांनी जानेवारीमध्येच रेल्वे मंत्र्यांच्या कडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. लातूर व मराठवाड्यासाठी महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या कलबुर्गी–लातूर नवीन ब्रॉडगेज विद्युतीकृत रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी (बांधकाम) 16 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून प्रकल्पासाठी राज्य सरकारने 50 टक्के खर्च उचलण्यास सहमती द्यावी, अशी विनंती केली आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी 157.82 किलोमीटर असून, त्यापैकी 96.82 किलोमीटर मार्ग महाराष्ट्रात येतो. या रेल्वेमार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला असून, प्रकल्पाचा अंदाजित खर्च 4917 कोटी आहे.
सध्या कलबुर्गी आणि लातूर हे रेल्वेमार्गाने सुमारे 345 किलोमीटरच्या वळणावरील मार्गाने जोडलेले आहेत. नवीन मार्ग उभारल्यानंतर दोन्ही शहरांदरम्यान थेट रेल्वे संपर्क निर्माण होणार असून, प्रवासाचे अंतर व वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. प्रस्तावित रेल्वेमार्ग धाराशिव जिल्ह्यातील उमरगा आणि लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातून जाणार असल्याने या भागातील उद्योग, व्यापार, शिक्षण, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याचे स्पष्ट केले असले, तरी आर्थिक परतावा अपेक्षित निकषांपेक्षा कमी असल्याने राज्य सरकारच्या आर्थिक सहभागाची आवश्यकता असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. राज्य सरकारची सहमती मिळाल्यानंतर प्रकल्प मंजुरीसाठी पुढील प्रक्रिया वेगाने होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.