Killari Earthquake Thirty Years : लातूरकरांना भूकंप झाल्याची माहिती होण्याआधी शरद पवार किल्लारीत होते...

Earthquake @1993 : तातडीने निर्णय घेत पवार यांनी प्रश्न मार्गी लावला.
Killari Earthquake Thirty Years
Killari Earthquake Thirty YearsSarkarnama
Published on
Updated on

-विजयकुमार स्वामी, लातूर

Latur : प्रसंग कोणताही, कितीही कठीण असो, तो कौशल्याने हाताळणे हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा गुण. पत्रकार या नेत्याने पवार यांच्या लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांतील अनेक दौऱ्यांचे वार्तांकन करण्याची संधी मिळाली. पवारांची स्मृती आणि त्यांच्या शब्दांमध्ये इतकी ताकद आहे की, भूतकाळातील आठवणींचा फ्लॅश बॅक नजरेसमोर जसाच्या तसा तरळतो... (Sharad Pawar was in Killari before the Laturkars came to know about Earthquake)

शरदरावांच्या दौऱ्यातल्या काही आठवणीतल्या प्रसंगापैकी एक म्हणजे किल्लारीच्या महाविनाशकारी भूकंपाच्या वेळचा आहे. श्री गणेशाला निरोप देऊन थकलेले भक्तगण साखर झोपेतच असताना ३० सप्टेंबर १९९३ च्या त्या काळरात्री धरणीकंप होऊन हजारो बळी गेले. ही घटना भल्या पहाटेच्या वेळी घडल्याने आणि त्याकाळी रेडिओ आणि दूरदर्शनशिवाय विश्वासार्ह माहिती मिळण्याचे माध्यम दुसरे कोणतेही माध्यम नव्हते. बीबीसी वृत्तसंस्थेने सर्वात आधी आणि पहिली बातमी देताना किल्लारी भूकंपात ५०० लोक मृत्यू पावल्याचे सांगितले होते. वेळ असेल, पहाटे साडेचार ते पाचदरम्यानची. पण प्रत्यक्षात लातूरकरांना दुर्घटना कळायला बराच वेळ झालेला होता. त्यावेळी शरद पवार प्रत्यक्ष किल्लारीत दाखल झालेले होते.

मुंबईतील १९९२ चे स्फोट आणि दंगलीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातून राज्यात परतलेले शरद पवार मुख्यमंत्री होते व दंगलीनंतरचे वातावरण जवळपास निवळत आलेले होते. त्या घटनेला वर्ष लोटते न लोटते तोच किल्लारी भूकंपाची आपत्ती राज्यावर येऊन कोसळली. या आपत्तीप्रसंगी शरद पवारांनी जे धैर्य दाखवले, प्रसंगावधान राखून मदत व बचाव कार्यास गती देत निर्णय घेतले, ते खरोखरच त्यांच्या आपत्ती व्यवस्थापन कौशल्याचा अच्युतम नमुना म्हणावा लागेल.

मंत्रालय मुंबईहून सोलापूरला आणले ..

भूकंप झाल्याची माहिती आणि त्याचा केंद्रबिंदू किल्लारी असल्याचे समजताच तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे झुंजमुंजू असतानाच तत्काळ किल्लारीत दाखल झाले आणि त्यांनी सर्व परिसराचा आढावा घेतला होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीपेक्षा प्रत्यक्षात खूप मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे, ही बाब लक्षात आल्याने पवार यांनी मंत्रालय मुंबईहून सोलापूरला आणले होते.

Killari Earthquake Thirty Years
Killari Earthquake Thirty Years : काळजाचा थरकाप उडविणाऱ्या किंचाळ्या अन्‌ मृतदेहांचे ढीग…; कार्यकर्त्यांसाठी ती शेवटची पहाट ठरली...

मानसोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची सोय ..

भूकंपबाधित लातूर व उस्मानाबादसह शेजारच्या सोलापूर, बीड प्रशासनाला मदत व बचाव कार्यात गती देण्याच्या सूचना केल्या. भूकंपानंतर पाऊस पडून बाका प्रसंग उद्‌भवला होता. भूकंपबळींचे अंत्यसंस्कार. त्यातच जात-धर्मानुसार अंत्यसंस्काराच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यावरही तातडीने निर्णय घेत पवार यांनी प्रश्न मार्गी लावला. घरेच्या घरे उद्‌ध्वस्त होऊन बेघर झालेल्या लोकांसाठी तात्पुरते निवारे उभे करणे, जखमी लोकांच्या औषधोपचारासह त्यांच्यासाठी अन्न व पाण्याची तसेच कपड्यांची व्यवस्था करणे, किल्लारी परिसरातील ६० ते ६५ गावांत वैद्यकीय शिबिरांची उभारणी इत्यादी कामांना पवार यांनी गती दिली होती. लोकांना दिलासा, धैर्य देण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची सोय केली गेली होती.

कुशल प्रशासकाची प्रचिती..

किल्लारी भूकंपाच्या आपत्तीप्रसंगी पवार यांनी जो मानसिकदृष्ट्या कणखरपणा दाखवला आणि ज्या धैर्याने प्रसंगाला तोंड दिले, ते त्यांच्यातील कुशल प्रशासकाची प्रचिती देणारे होते. तत्कालीन परिस्थितीत पवार यांनी शासकीय, सामाजिक व सेवाभावी संस्थांची यंत्रणा ज्या पद्धतीने हाताळली ते कौतुकास्पद होते. समाजातील प्रत्येक घटकाचा या आपत्तीप्रसंगी पवार यांनी अतिशय कौशल्याने वापर करून घेत सर्वांना मदत व बचाव कार्यात सहभागी करून घेतले. या आपत्तीनिमित्ताने प्रत्येकाच्या मनात सेवाभावाची बीजे रुजवली.

आंतरराष्ट्रीय मदतीचा ओघ सुरू ..

भूकंपाच्या वेळी अन्य कोणावरही अवलंबून राहण्यापेक्षा पवार यांनी स्वतःच्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणी करवून घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, पालकमंत्री यांना पवार यांनी जाणीवपूर्वक वेगळ्या प्रकारची जबाबदारी दिली. आंतरराष्ट्रीय मदतीचा ओघ सुरू झाला, तेव्हा त्याचाही समन्यायी लाभ सर्वांना मिळावा, यासाठीही त्यांनी परिश्रम घेतले. मदत आणि बचाव कार्यानिमित्त जमलेली समाजकंटक, लुटारूंची गर्दी दूर करण्याच्या पोलिस प्रशासनास सूचना केल्या.

पवार योद्ध्याच्या आवेशात सतत लढत असतात..

भूकंपाच्या आपत्तीप्रसंगी केलेल्या कामांचा उल्लेख शरद पवारांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रातही येतो. पवार यांच्या मार्गात अनेकदा अनेकांनी वेगवेगळ्या कारणांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पवार सर्वांना पुरून उरले. मुंबईतील बॉम्बस्फोट, जातीय दंगली असोत की, मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार, नवे विद्यापीठ स्थापना असो. पवार नेहमीच सक्षमपणे आणि समर्थपणे लढत राहिले. सोबत सेनापती असो किंवा नसो, पवार योद्ध्याच्या आवेशात सतत लढत असतात, ते त्यांच्यावर निरतिशय प्रेम करणाऱ्या राज्यातील लाखो सैनिकांच्या जीवावर. सगळे आप्तस्वकीय, नातेवाईक व बिनीचे शिलेदार बेईमान झालेले असतानाही पवार विधानसभेच्या कुरुक्षेत्रात लढले आणि जिंकले, ते त्यांच्या स्वतःच्या अढळ आत्मविश्वास व कर्तृत्वाच्या बळावरच...!

Edited By : Mangesh Mahale

Killari Earthquake Thirty Years
Kiran Samant News : उदय सामंत यांच्या भावाच्या 'मशाली'वरून शिंदे गटात 'आग'; 'जो भी हो देखा जायेगा', उदय सामंताच्या करिअरमुळे माघार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com