Shivsena News : महापालिका निवडणुक जाहीर होत नाही तोच प्रभागातील उमेदवारीवरून शिवसेनेतील आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली आहे. विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल यांनी आपले चिरंजीव ऋषीकेश यांच्यासाठी गुलमंडी प्रभागावर दावा सांगितला आहे. तर माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी भाऊ किंवा मुलाला उमेदवारी मिळावी, हा प्रभाग आमचा स्टॅंडिग असल्याचे सांगत दंड थोपटले आहे. परंतु उमेदवारी कोणाला द्यायची? यासाठीच्या मुख्य समन्वय समितीत तनवाणी नसल्याने आमदार प्रदीप जैस्वाल यांचेच पारडे जड ठरण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर किशनचंद तनवाणी यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांची भेट घेत मार्ग काढण्याची विनंती केली आहे. पक्षात आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, कार्यक्रमांचे निरोप दिले जात नाही, आमची अडचण होत असेल तर आम्हाला पदमुक्त करा, अशा आक्रमक पावित्रा घेत तनवाणी यांनी सूचक इशाराही दिला आहे. जैस्वाल-तनवाणी वादावर घरात भांड्याला भांडे लागणारच, वाद-गटबाजी हे पक्षाच्या जिवंतपणाचे लक्षण असल्याचे सांगणाऱ्या संजय शिरसाट यांनी तनवाणी यांची तक्रार गांभीर्याने घेतली आहे.
मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीनंतर यावर तोडगा काढू, तुर्तास शांत राहा, असा सल्ला शिरसाट यांनी तनवाणींना दिल्याचे समजते. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुलमंडीवरून शिवसेनेतील नाराजी नाट्य शमलेले नाही. प्रदीप जैस्वाल यांचे चिरंजीव आणि मुख्य समन्वय समितीचे सदस्य ऋषिकेश जैस्वाल यांचे पारडे जड असल्याने नाराज माजी आमदार किशनचंद तणवाणी यांनी आज संजय शिरसाट यांची भेट घेत स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून मोठ्या अपेक्षेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवून आपण पक्षात प्रवेश केला. माजी आमदार, माजी महापौर आणि विधानसभा निवडणुकीत उद्धवसेनेकडून मिळालेल्या उमेदवारीवर पाणी सोडून आपण शिवसेनेचे काम केले. असे असताना पक्षात मात्र आपल्याला योग्य सन्मान दिला जात नाही, असे म्हणत त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांवर खापर फोडले.
महापालकेतील युतीसाठी शिवसेना- भाजपची आज प्राथमिक बैठक झाली. त्यात समन्वय समितीचे सदस्य होते. या समितीत आधीच तनवाणी यांना टाळण्यात आले आहे. गुलमंडीतून मुलगा किंवा भावाला उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर होत असल्याने बेचैन झालेल्या तनवाणी यांनी पालकमंत्र्यांचा बंगला गाठला आणि आपली कैफियत मांडली. कालपर्यंत एकमेकांना पाण्यात पाहणारे आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यात मात्र आता दिलजमाई झाली आहे.
दोघेही समन्वय समितीत असल्याने गुलमंडी प्रभागातून ऋषीकेश जैस्वाल यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. तनवाणी यांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी आता दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे. पदमुक्त करा, असे म्हणत तनवाणी यांनी एकप्रकारे पक्षाला अल्टीमेटमच दिला आहे. गुलमंडीवरील उमेदवारीवर बालंट आले, तर तनवाणी धक्कादायक निर्णय घेऊ शकतात? अशी चर्चा आहे. शिरसाट, जंजाळ यांच्यातील वाद अजून पूर्णपणे शमलेला नाही. तोच माजी महापौरांच्या एका गटाकडून तणवाणी यांनी पुढे करून या नाराजी नाट्याला हवा दिली जात असल्याचीही जोरदार चर्चा आहे.
ठाकरे गट सोडून आम्ही शिवसेनेत आल्यावर अनेक कार्यकर्ते आमच्यासोबत पक्षात आले. पण आम्हाला आता कुणीही पक्षात विचारत नाही. मी माजी आमदार, माजी महापौर आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची उमेदवारी नाकारून मी विधानसभा निवडणूकीपुर्वी पक्षात आलो. त्यानंतर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, अशोक पटवर्धन यांच्यासह आलेल्या लोकांना स्थानिक पदाधिकारी विश्वासात घेत नाहीत. काही कार्यक्रम असल्यास आम्हाला निरोप मिळत नाही.
स्थानिक पदाधिकाऱ्यांना आमची अडचण असेल तर आम्हाला पदमुक्त करा, दुसरी जबाबदारी द्या. जेणे करून पक्ष वाढेल असे तनवाणी यांनी म्हटले आहे. तनवाणी यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतल्यानंतर संजय शिरसाट यांनी कॅबिनेटहून परतल्यावर यावर तोडगा काढू, चर्चा करू असे आश्वासन देत तनवाणी यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.