

Vilas Ghule Murder: केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले याची २० जून रोजी एका टोळक्याने चाकू हल्ला करून हत्या केली होती. हॉटेलमध्ये झालेले भांडण सोडवायला गेलेल्या विलास याला आपला जीव गमवावा लागला. या हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव आल्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांनी विधिमंडळात या हत्या प्रकरणाचे खरे सूत्रधार शोधून त्यांना अटक करा, अशी मागणी लावून धरली. काल माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी विलास घुले यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर आज धनंजय मुंडे टाकळीत घुले कुटुंबियांच्या भेटीसाठी जात आहेत.
विलास घुले हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील राजकारण पुन्हा पेटले आहे. जातीय तेढ आणि तणाव वाढताना दिसतो आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन पावणे दोन वर्ष उलटली आहेत. त्याच केज तालुक्यात २० जून रोजी विलास घुले या तरुणाची आठ-नऊ जणांच्या टोळक्यानी चाकूने भोसकून हत्या केल्याने पोलीसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. अवघ्या दोन दिवसात सर्व ९ आरोपींना पोलीसांनी अटक केले. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलक आणि घुले कुटुंबियांशी संवाद साधून आरोपींना कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन दिले होते.
दरम्यान, खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ यांचे नाव या प्रकरणात आल्याने याला राजकीय वळण मिळाले. सोनवणे-मुंडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. पोलीसांनी सौरभचे नाव पुरवणी जबाबात घेतले असून पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी या प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करण्याचे जाहीर केले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काल प्रीतम मुंडे यांनी पिडित कुटुंबाची भेट घेत पोलीसांकडून सहकार्य मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच विलास घुले व त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशाराही दिला होता.
आता धनंजय मुंडे टाकळीत घुले कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. धनंजय मुंडे यांनी हे प्रकरण गंभीर असून या घटनेमागील खरा सूत्रधार शोधून त्याला कडक शासन करावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली आहे. विलास घुले हत्या प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून वस्तुनिष्ठ व सर्व बाजूंनी तपास करून दोषींना कठोर शासन केले जावे व पीडित घुले कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा,अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. या दुर्दैवी घटनेत दोषी असलेल्या सर्वांना कठोर शासन केले जाईल, याबाबत फडणवीस यांनी त्यांना आश्वास्त केल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.
बीड जिल्हा व धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात गेल्या काही महिन्यात अनेक दुर्दैवी घटना, हत्येची प्रकरण घडली आहेत. यापैकीच एक म्हणजे परळीतील तोहीद खान हत्या प्रकरण. या संदर्भात आपण पुढील आठवड्यात विधिमंडळात सखोल चौकशी तसेच वाढत्या नशेखोरीबाबत कारवाई करण्याची मागणी करणार आहे. तोहीद खान यांच्या हत्या प्रकरणी दोन मुख्य आरोपी अटकेत असून या केसचा सर्व बाजूंनी वस्तुनिष्ठ तपास केला जावा, अशी मागणी करणार असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.
तोहीद खान यांच्या कुटुंबियांची मी याआधी भेट घेतलेली असून त्यांना तात्पुरती आर्थिक मदत करत त्यांच्या तीनही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. विलास घुले हत्या प्रकरणी आवाज उठवत असताना विलास यांचा अंत्यविधी बाकी होता, त्यामुळे ते प्रकरण तातडीचे होते. तसेच विलास घुले व तोहीद खान प्रकरणी एकच वेळी बोलल्यास अर्थात दोन वेगवेगळे विषय एकाच वेळी हाताळल्यास त्या विषयांचे महत्व कमी होऊ शकते, याची मला पूर्ण जाणीव आहे. तोहीद खान या आमच्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार, किंबहुना मी ती माझी जबाबदारी समजतो, असेही मुंडे यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.