
Nanded News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी राज्यातील महायुती सरकारला निर्वाणीचा इशारा देत निवडणुकीआधी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमुक्तीच्या आश्वासनाची पूर्तता करा, नाहीतर नरडीचा घोट घेऊ, असा दम भरला. सरकारकडे पैसे नाही म्हणता, मग आमदार- खासदार, अधिकाऱ्यांचे पगार करायला पैसे कुठून येतात? पाच वर्षासाठी ते बंद का करत नाही? असा सवालही तुपकर यांनी केला.
शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नावर नांदेडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक रविकांत तुपकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ते चांगलेच आक्रमक झाले होते. महाराष्ट्रातला शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे, सरकार मात्र आपल्या मस्तीत मश्गुल असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला. निवडणुकीपूर्वी महायुतीने शेतकर्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते ते त्यांना पाळावेच लागेल. त्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न जर सरकारने केला तर आम्ही त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही.
आम्ही सगळी शेतकर्यांची पोरं आता एका निर्धारने बाहेर पडलो आहोत. (Ravikant Tupkar) गावा गावात आम्ही किसान आर्मी उभी करणार असून जो मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी शेतकर्यांना त्रास देईल त्यांना आक्रमकपणे धडा शिकवला जाईल. शेतकर्यांच्या मालाला हमीभाव द्या, कर्जमुक्तीचे आश्वासन पूर्ण करा, ज्या भागामध्ये शेतकर्यांच्या ऊसाचे पैसे कारखान्यांनी दिले नाही ते तातडीने द्या, कांद्याला दोन हजार रुपये भाव, दुधाला अनुदान द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दुरूस्तीच्या नावाखाली शेतकरी पिक विमा योजना बंद न करता ती अधिक सुलभ कशी करता येईल? त्या संदर्भात तातडीने निर्णय घेऊन शेतकर्यांना पिक विमा द्या, या मागणीसाठी आम्ही मोठे आंदोलन उभारणार आहोत असेही तुपकर यांनी स्पष्ट केले. येत्या पंधरा दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्यांची पोरं जनजागृती करणार आहे. कर्जमुक्तीच्या आश्वासनापासून या सरकारला पळता येणार नाही, जर आमचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला.
कर्जमुक्तीसाठी सरकारकडे पैसा नाही असे सांगितले जाते मग आमदार, खासदार आणि अधिकार्यांचे पगार पाच वर्षे का थांबवत नाही? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही तर मग आमदार- खासदारांच्या सुरक्षेवर आणि चंगळवादावर पैसा खर्च करायला कुठून येतो? पैसे नाही तर मग शक्तिपीठ महामार्ग दहा वर्षासाठी का थांबत नाही? असा सवाल तूपकर यांनी केला.
शक्तिपीठ महामार्गातूनच आमदार- खासदार- खडी, रेती, मुरूम यातून पैसा कमावणार आहेत. यातूनच त्यांची समृद्धी होणार आहे, असा आरोप करत जिथून शक्तीपीठ महामार्ग सुरू होतो आणि जिथे संपतो त्या भागातील सगळे आमदार- खासदार मलामाल होणार आहेत. या शक्तीपीठ महामार्गातूनच 2029 च्या लोकसभा निवडणुकीसाठी फंड उभा करण्याचा छुपा अजेंडा यामागे असल्याचा गंभीर आरोप रविकांत तुपकर यांनी केला. पेरणीपूर्वी राज्यभरात शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभरात गनिमी काव्याने क्रांतीकारी आंदोलन पुकारले जाईल. हे आंदोलन सरकारच्या बुडाखाली आग लावणारे असेल, असा इशाराही तुपकर यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.