Marathwada News : मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून समाज बांधव लाखोच्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, बीड जिल्ह्यातील एका आंदोलकाचा दोन दिवसापुर्वी ह्दयविकाराचा झटका आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर काल लातूर जिल्ह्यातील आणखी एका 35 वर्षीय तरूण आंदोलकाचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मराठवाड्यातील दोन तरुणांच्या मृत्यूमुळे आंदोलकांमध्ये दुःखाचे वातावरण आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील दोन तरुणांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, मराठा आरक्षण (Maratha Reservation) घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी केला आहे. मुंबईच्या आझाद मैदानातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. राज्य सरकारकडून चर्चेचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप तोडगा निघालेला नाही. उलट मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून पाणी न पिण्याचा निर्णय घेतल्याने वातावरण अधिकच तापले आहे.
त्यातच अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील तरुण आंदोलकाचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विजय चंद्रकांत घोगरे (35 वर्ष) असे या तरुणाचे नाव आहे. मुंबईतील आझाद मैदान या उपोषणस्थळी अचानक ह्दयविकाराचा झटका आल्याने घोगरे खाली कोसळले. (Mumbai) रुग्णालयात उपचारासाठी नेण्याची इतर आंदोलकांनी धावपळ केली, परंतु त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. दोन दिवसात ह्दयविकाराने दोन मराठा आंदोलकांना प्राण गमवावे लागल्याने आंदोलनस्थळी शोकाचे वातवरण होते. तर दुसरीकडे सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याबद्दल संताप आणि चीडही होती.
विजय चंद्रकांत घोगरे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. कुटुंबाचा दोन एकर कोरड वाहू जमिनीवर उदरनिर्वाह चालतो. विजय घोगरे हे अहमदपूर येथील खाजगी रुग्णालयात कामाला होते. सध्या चारचाकी गाडी स्वतः चालवणे व भाड्याने देण्याचे ते काम करत होते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात विजय घोगरे हे नेहमी सक्रीय असायचे. मराठा आरक्षण संदर्भात निघालेल्या प्रत्येक आंदोलन ठिकाणी तसेच मोर्चात ते सहभागी व्हायचे.
मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या चलो मुंबई 29 ऑगस्ट हाकेला प्रतिसाद देत विजय घोगरे हे आपली गाडी घेऊन व गावातील इतर समाज बांधवासह 27 ऑगस्ट ऑगस्टला मुंबईकडे रवाना झाले. 30 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर उपोषण स्थळी दाखल झालेल्या विजय घोगरे यांचा कालपासून अन्नत्याग केल्यामुळे आज हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान त्यांना मुंबई येथील जे.जे. रुग्णालयातील दाखल केले असता डॉक्टरानी तपासून मृत घोषित केले.
दोन दिवसापुर्वी केज तालुक्यातील वरपगाव येथीलसतीश ज्ञानोबा देशमुख (वय 44) या बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलकाचा जुन्नर येथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. दरम्यान, मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकार आणखी असे किती जीव जाण्याची वाट बघणार आहे. शासनाने आरक्षणा संदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी टाकळगावचे सरपंच युवराज घोगरे यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.