
Beed News : सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन चौदा दिवस उलटून गेले तरी यातील मुख्य आरोपी फरार आहेत. या घटनेमागचा मास्टरमाईंड शोधला जाईल, तपासात कुणाचाही राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, आरोप कुणाच्या जवळचा आहे, हे पाहिले जाणार नाही, अशी ग्वाही सत्ताधारी पक्षाचे नेते, मंत्र्यांनी मस्साजोग भेटीत दिली होती. मात्र प्रत्यक्षात मुख्य आरोपींच्या अटकेसाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीये.
संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे झालेल्या हत्येने बीड जिल्ह्यासह राज्य हादरून गेले. बीडमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी शनिवारी (ता.28) बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात आज बीडमध्ये सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, आजी-माजी आमदार आणि समन्वयकांची एक बैठक पार पडली. या बैठीकत मोर्चा काढण्याचा ठराव घेण्यात आला. त्यानूसार 28 रोजी बीड शहरात सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून कलेक्टर ऑफिसवर हा मोर्चा धडकणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अनेक पक्षाच्या नेत्यांनी मस्साजोग येथे भेट देऊन संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली होती. तर आज काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे मस्साजोगमध्ये पिडित देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
नागूपर येथे झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मोठे वादंग निर्माण झाले होते. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळुंके यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करुन कठोर शिक्षा करा, अशी मागणी केली होती. या प्रकरणात सात पैकी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या विश्वासू सहकारी वाल्मिक कराड याचे नाव या प्रकरणाशी जोडले गेले असून तोच मास्टरमाईंड असल्याचा आरोप अनेक लोकप्रतिनिधींनी केला आहे.
खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल असलेला वाल्मिक कराड फरार असून पोलिस संतोष देशमुख खून प्रकरणाती मुख्य आरोपींसह कराड याचाही शोध घेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी, सीआयडीमार्फत चौकशी सुरू केली असून बीडच्या पोलिस आयुक्तांची बदलीही केली आहे. नव्या पोलिस आयुक्तांनी पदभार स्वीकारत तपासाला वेग देऊन आरोपीना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत दिला.
दरम्यान, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी रडत बसून चालणार नाही, कोणाच्याही दहशतीला घाबरायचे नाही, आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल, असे आवाहन शरद पवार यांच्या बीड दौऱ्यात केले होते. तेव्हा सर्वपक्ष मिळून बीड जिल्ह्यातील दहशत आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी ठोस पावले उचलणार असल्याचे सांगितले होते. लवकरच सर्वपक्ष, संघटनांची बैठक घेणार असल्याचेही क्षीरसागर यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यानूसार आज झालेल्या बैठीकत बीडमध्ये 28 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.