Nanded Heavy Rain News : नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने हाहाकार उडाला. सहाहून अधिक लोकांचा या महापूरात बळी गेला. शेतीचे अतोनात नूकसान झाले, घरादारांची पडझड झाली, जनावरं वाहून गेली. आस्मानी संकट ओढावलेले असताना सरकारनेही या पुरग्रस्तांकडे दुर्लक्ष केले. लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांनी संकटात आम्हाला वाऱ्यावर सोडले, असा आरोप करत पूरग्रस्तांनी आपला राग पालकमंत्री अतुल सावे यांच्यावर काढला.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती, घरादारांची पाहणी करण्यासाठी आलेल्या अतुल सावे (Atul Save) यांचा ताफा अडवत त्यांच्या वाहनांसमोर झोपण्याचा प्रयत्न काही पूरग्रस्तांनी केला. अखेर पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढत त्यांना बाजूला नेले. पूरग्रस्तांचा रोष इतका होता की त्यांनी सरकारने आम्हाला मारून टाकांव, अशा शब्दात आपल्या तीव्र भावना पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.
पालकमंत्री अतुल सावे रविवारी मुखेड तालुक्यातील हासनाळ गावातील पूरग्रस्तांना भेट देऊन त्यांची विचारपूस करण्यासाठी येत असताना एक हृदयद्रावक प्रसंग घडला. (Nanded) हासनाळचे पूरग्रस्त चांदोबा पुंडलिक थोटवे हे भावनावश झाले आणि लेंडी धरणामुळं आमचं घर, शेत, जनावरं सगळं गेलं. सरकारनं आम्हाला मारून टाकावं, अशा भावना व्यक्त केल्या. सावे यांचा ताफा अडवत त्यांच्या वाहनाखाली झोपण्याचाही प्रयत्न झाला. वेळीच त्यांना पोलिसांनी बाजूला घेत त्यांची समजूत काढत त्यांना शांत केले.
अतुल सावे यांनी सरकार पीडितांना वाऱ्यावर सोडणार नाही. जे दोषी आहेत त्यांच्यावर चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल. ही घटना दुर्दैवी असून, याचा तपास करण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांसोबत तातडीची बैठक घेणार असल्याचे सांगत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. हासनाळ, रावणगाव, मुक्रमाबाद येथे भेट देत त्यांनी पूरग्रस्तांची विचारपूस करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे संकट?
खासदार अशोक चव्हाण यांनी देखील पूरग्रस्तांची भेट घेत घडलेली घटना केवळ नैसर्गिक आपत्ती नाही, तर नियोजनातील त्रुटीमुळे घडली आहे. धरणाचे 14 दरवाजे असून, त्यातील फक्त 4 दरवाजे उघडे होते, त्यामुळे विसर्ग योग्य वेळी न झाल्याने ही आपत्ती ओढवली. यामुळे संबंधित कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके हे जबाबदार असतील, तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्तक्षेपाने विवेकानंद तिडके यांना सक्तीच्या रजेवर पाठवले असून, उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या पाहणी दौऱ्यात खासदार अशोक चव्हाण, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलिस अधीक्षक अबनिश कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, उपजिल्हाधिकारी अनूप पाटील, डीवायएसपी संकेत गोसावी, तहसीलदार राजेश जाधव आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.