Latur News : विधीमंडळ अधिवेशनात मोबाईलवर रमी खेळणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा आधी राजीनामा घ्या, मगच लातूरमध्ये पाय ठेवा, असे आवाहन अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 26 जुलै रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्याआधीच त्यांनी कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा आम्ही त्यांना लातूरमध्ये पाय ठेवू देणार नाही, असा इशाराच जावळे यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या छावाच्या जिल्हाध्यक्षावर सुरज चव्हाण व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. त्यांना बेदम मारहाण केल्यानंतर याचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटू लागले आहे. (Manikrao Kokate) या हल्ल्याचा बदला घेतला जाईल, असा इशारा देत छावाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. वातावरण पेटू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस युवकच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला सांगितला.
दुसरीकडे विधीमंडळाच्या अधिवेशनात रमी खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) तातडीने घ्यावा. अन्यथा त्यांना 26 जुलै रोजी लातूरमध्ये पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा नानासाहेब जावळे यांनी पत्रकारांशी सवाद साधताना दिला. मुख्यमंत्रीच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनाही रस्त्यावर फिरु देणार नाही, असे जावळे यांनी निक्षूण सांगीतले.
छावा संघटनेचे शेतकरी आघाडीचे नेते विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीच्या विरोधात लातूर बंदमध्ये जावळे पाटील सहभागी झाले होते. विधीमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्ना्वर चर्चा करण्याचे सोडून कृषीमंत्री कोकाटे हे रमी खेळत असल्याचे राज्याने पाहिले. त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी घाडगे व काही कार्यकर्ते सनदशीर मार्गाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना भेटण्यासाठी गेले होते.
निवेदन दिल्यानंतर काही वेळाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण व कार्यकर्त्यांनी घाडगे व कार्यकर्त्यांना मारहाण केली. चव्हाण यांनी कायदा हातात घेतला आहे, त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे.छावा संघटना आपल्या स्टाईलने त्याला धडा शिकवेलच. 26 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांचा लातूर दौरा आहे. त्या पूर्वी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा त्यांनी घ्यावा. अन्यथा त्यांना छावा संघटना लातूरमध्ये पाऊल ठेवू देणार नाही, याचा पुनरुच्चारही जावळे यांनी केला.
सकल मराठा समाजही आक्रमक
विधिमंडळाच्या अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी रमी खेळणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना 25 जुलैपर्यंत बडतर्फ करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक अॅड. उदय गवारे यांनी दिला आहे. कृषिमंत्री कोकाटे विवेकशून्य आहेत. दोन वर्षांची शिक्षा होऊनही त्यांना मंत्रिपदावर ठेवले आहे. पीकविम्यासंदर्भात 'एक रुपया भिकारीही घेत नाही', 'ढेकाळाचे पंचनामे करायचे का"?’, 'कृषी विभाग हा ओसाड गावची पाटीलकी आहे', अशी अनेक मुक्ताफळे त्यांनी याआधी उधळली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.