
नांदेड जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष रंगत आहे.
दोन्ही नेत्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांसह जनसंपर्क मोहिमा आणि संघटनात्मक बळकटीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
आगामी निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात कोणता पक्ष नंबर वन ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Nanded Political News : भाजपाचे खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यातील संघर्ष नव्याने उफाळून आला आहे. एकमेकांचे पारंपारिक विरोधक असलेल्या या दोन मोठ्या नेत्यांमध्ये आपापला पक्ष नंबर एक करण्याची स्पर्धा लागली आहे. यातून टीका, आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्यानंतर चव्हाण-चिखलीकर शांत होते. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्या तसे दोन्ही नेते ऐकमेकांवर तुटून पडले आहेत. प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात नंबर एकचा होईल, असा दावा वारंवार केला आहे. सर्वाधिक माजी आमदार आणि काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे),राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काही प्रमाणात भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्ष प्रवेश देत चिखलीकरांनी अशोक चव्हाण यांच्यावर मात केली आहे.
अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मात्र आता कुठे आपले डाव टाकायला सुरूवात केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाला नंबर एकचा पक्ष करण्याचा निर्धार त्यांनी नुकताच एका कार्यक्रमात बोलून दाखवला. संघटनात्मक बांधणीत आपल्याला हव्या त्या समर्थकांची नेमणूक करून घेतल्यानंतर चव्हाण यांनी सगळी सूत्रं आपल्या हाती घेतली आहेत. पक्षानेही त्यांच्याकडेच नेतृत्व सोपवल्याने नंबर एकसाठी चिखलीकर-चव्हाण या मित्र पक्षातील दोन नेत्यांमध्ये रस्सीखेच होणार आहे.
भाजपा-महायुती सरकारकडून नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी, महापूराने शेतकऱ्यांचे प्रचंड नूकसान झाले. त्याची भरपाई, मोठी मदत मिळवून घेण्यात चिखलीकर आणि चव्हाण दोघेही यशस्वी ठरले आहेत. चिखलीकरांनी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. तर अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून, निवेदनाच्या माध्यमातून अतिवृष्टी, महापूरात नूकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही,यासाठी प्रयत्न केले.
परिणामी 7 ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जाहीर केलेल्या 32 हजार कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजचा सर्वाधिक लाभ नांदेड जिल्ह्याला मिळाला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने आजवर दिलेले हे सर्वात मोठे पॅकेज असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 16 तालुक्यांचा या मदत पॅकेजमध्ये समावेश झालेला आहे. एकही तालुका किंवा एकही मंडळ वगळण्यात आलेले नाही.
अर्थात नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने नूकसानच प्रचंड झाले आहे. त्यामुळे सरकारची संपूर्ण मदत मिळवून देण्यात अशोक चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर या दोन्ही नेत्यांचे योगदान आहे. जिल्ह्याच्या विकासकामांसाठी या दोन नेत्यांमध्ये स्पर्धा होत असेल तर ते नांदेडकरांसाठी फायद्याचेच ठरणार आहे. राजकीय हेवेदावे किंवा कुरघोडीचे राजकारण या पुढील काळात अधिक तीव्र होऊ शकते.
चिखलीकर-चव्हाण हे दोघेही आपापल्या पक्षातील वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. पण हे वजन त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासकामासाठी वापरावे, एकमेकांना पाण्यात पाहण्यासाठी किंवा पंख छाटण्यासाठी नाही, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती होते की मग स्वबळाचा विचार केला जातो? यावर चिखलीकर-चव्हाण यांच्यातील संघर्ष थांबणार की वाढणार? हे ठरणार आहे.
1. नांदेडमध्ये संघर्ष कोणाच्या दरम्यान सुरू आहे?
अशोक चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या दरम्यान संघर्ष सुरू आहे.
2. या संघर्षाचे कारण काय आहे?
नांदेड जिल्ह्यात राजकीय वर्चस्व आणि आगामी निवडणुकीतील पक्षाचा प्रभाव वाढवण्याची स्पर्धा हे मुख्य कारण आहे.
3. दोन्ही नेत्यांचे स्थानिक पातळीवरील बळ किती आहे?
अशोक चव्हाण यांचा पारंपरिक गट मजबूत आहे, तर चिखलीकर यांना सत्तेचा लाभ मिळतोय.
4. या संघर्षाचा परिणाम आगामी निवडणुकीवर होऊ शकतो का?
होय, नांदेड हा भाजपचा गड मानला जातो; त्यामुळे या संघर्षाचा प्रभाव जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांवर पडू शकतो.
5. कोणता पक्ष सध्या आघाडीवर आहे?
सध्या दोन्ही गट सक्रिय असून स्थानिक स्तरावर जनतेचा कल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलत असल्याचे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.