Heavy Rain News : संपूर्ण नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी, ढगफुटीने थैमान घातले आहे. माणसं, जनावरे, शेती पीकं डोळ्यादेखत वाहून जात असल्याने पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून सत्ताधारी केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप केला जातोय. जिल्ह्यातील जनता आस्मानी संकटाशी झुंज देत असताना सत्ताधाऱ्यांचे होणारे कमालीचे दुर्लक्ष याचा फटका पालकमंत्री अतुल सावे यांना बसला. नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आलेल्या अतुल सावे यांच्या समोर पूरग्रस्तांनी संताप व्यक्त करत 'आम्ही पुरात बुडत होतो, तेव्हा तुम्ही कुठे होता? असा सवाल केला.
लोकांचा रुद्रावतार पाहून प्रत्यक्ष शेतात किंवा पडझड झालेल्या घरात जाऊन पाहणी न करता अतुल सावे (Atul Save) रोडवरूनच पाहणी करून माघारी फिरले. गेल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात आभाळ कोसळल्याची परिस्थिती होती. लेंडी नदीच्या पुरामुळे हसनाळ्यासह सहा गावे पुरात बुडाली होती. नांदेड महापुराच्या विळख्यात सापडले असताना पालकमंत्री अतुल सावे उशिराने पाहणीसाठी आले. त्यावेळी देखील त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.
शनिवारी कहाळा, बरबडा, कुंचली या पूरग्रस्त भागाचा दौरा पालकमंत्र्यांनी केला. सरकारकडून काही मदत मिळेल, अशी अपेक्षा पूरग्रस्त बाळगून होते. मात्र सावे यांनी दूरवरूनच नुकसानीची पाहणी केली. (Nanded) त्यामुळे संतापलेल्या कुंचलेतील पूरग्रस्तांनी सावे यांना घेराव घातला. ढगफुटीने झालेल्या नुकसानीची माहिती पूरग्रस्त देत होते, त्यावर पंचनामे करायला सांगितलेत असे उत्तर सावे यांनी दिले. यावर संतापलेल्या ग्रामस्थांनी गेल्या वर्षीचाच विमा अजून मिळालेला नाही, असे सुनावत जाब विचारला.
त्यामुळे पालकमंत्र्यांनी गावातून निघून जाणे पसंत केले. नायगाव आणि बरबड्यातही सावे यांनी दुरूनच नुकसानीची पाहणी करत कुंडलवाडीकडे प्रयाण केले. तिथेही त्यांना पूरग्रस्तांच्या रोषाचा सामना त्यांना करावा लागला. त्यांची गाडी अडवण्याचाही प्रयत्न झाला त्यामुळे सावे आल्या पावली परत फिरले. यावेळी सरकार विरोधात पूरग्रस्तांनी घोषणाबाजीही केली. तर काही पूरग्रस्तांनी चिखलात ठिय्या आंदोलन करत सरकराचा निषेध व्यक्त केला.
आमदार राजेश पवार कुठे आहेत ?
दरम्यान पालकमंत्री अतुल सावे यांच्या दौऱ्यात भाजपचे स्थानिक आमदार राजेश पवार यांची अनुपस्थिती अनेकांना खटकली. अतिवृष्टीच्या तडाख्याने गावे उद्ध्वस्त झाली असताना, लोकांचे संसार उघड्यावर आले असताना आमदार राजेश पवार यांना पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी वेळ मिळाला नाही का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला. तर नांदेडचे काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांनीही पालकमंत्री यांनी कोणतेही ठोस मदतीचे आश्वासन न देता पाहणी दौरा गुंडाळल्याचा आरोप केला. तसेच तातडीने पूरग्रस्तांना मदत दिली नाही, नुकसानीचे पंचनामे केले नाही, तर पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, अशा इशारा दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.