मुंबई : शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि त्यांनी दिल्लीत भाजपच्या मंत्र्यांची घेतलेली भेट सध्या चांगलीच चर्चेत आहे. (Shivsena) त्यातल्या त्यात नितीन गडकरी यांच्याकडे शिवसेना-भाजपला एकत्र आणण्याची चावी आहे, ते युतीचा पुल पुन्हा बांधू शकतात या विधानवरून तर राज्याच्या राजकारणात चांगलाच धुराळा उडाला आहे. (Abdul Sattar) पण राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मात्र अब्दुल सत्तार यांची चांगलीच खिल्ली उडवली.
नितीन गडकरी हे मोठे नेते आहेत, ते या दोन पक्षाला एकत्रित आणू शकतात हे अब्दुल सत्तार यांना वाटले याचा मला आनंद आहे. पण सत्तार यांना अजून शिवसेना काय आहे हे माहितच नाही, नया है वह.. अशा शब्दांत फडणवीस यांनी सत्तारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. मुंबईत फडणवीस यांना प्रसार माध्यमांशी सत्तार यांच्या विधानाची आठवण करून देत प्रश्न विचारला.
यावर फडणवीस म्हणाले, नितीन गडकरी हे शिवसेना-भाजपला एकत्र आणू शकतात असे सत्तार यांना वाटले याचा मला आनंद आहे. गडकरी मोठे नेते आहेतच, पण सत्तार यांच्या बाबतीत नया है वह असेच म्हणावे लागेल. सत्तार यांना अजून शिवसेना माहितच नाही, गेल्या पाच-सहा महिन्यात सत्तार मुख्यमंत्र्यांना भेटल्याचे देखील माझ्या पाहण्यात नाही.
त्यामुळे अशा विषयावर बोलायला कुणी तरी महत्वाचा माणूस पाहिजे, अशा शब्दात फडणवीस यांनी सत्तार यांच्या विधानाकडे दुर्लक्ष केले. अब्दुल सत्तार हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. कालच त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी नितीन गडकरी, गृहमंत्री अमित शहा यांनी जर पुढील अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदा बाबत शब्द दिला, तर शिवसेना-भाजप युती शक्य आहे, असे विधान केले होते.
नितीन गडकरी यांना राज्यातील पुले जोडण्याचा अनुभव आहे, त्यामुळे तेच दोन पक्षांमधील संबंध सुधारण्याचा आणि ते एकत्र येण्याचा पूल बांधू शकतात. त्यांच्याकडेच याची चावी आहे, असे म्हटले होते. या शिवाय मुख्यमंत्री पदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे किंवा चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्याकडे दिला तर शिवसैनिक म्हणून आम्हाला आनंदच होईल, या निर्णयाला कुणाची हरकत नसले, असेही सांगितले होते.
या दोन विषयांवरून राज्यात चर्चेला उधाण आलेले असतांना आणि पुन्हा युती होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. परंतु सत्तार यांच्या विधानाला फारसे महत्व देण्याची गरज नाही, ते शिवसेनेत नवे आहेत, त्यांना अजून तो पक्षच कळालेला नाही, असा टोला लगावत फडणवीस यांनी या विधानातील हवाच काढून टाकली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.