

Dharashiv News : राज्यातील12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी शनिवारी मतदान पार पडले.त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असले तरी मतमोजणी सुरु होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यातच एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. या आकडेवारीनुसार पुन्हा एकदा धाराशिव जिल्हयात भाजपच मोठा पक्ष असणार असल्याचे समोर आले आहे. मात्र, सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गरज लागणार आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना व महाविकास आघाडीचे एकत्रित आकडे पाहिले तर धाराशिव जिल्हयात सत्तेसाठी वेगळे समीकरण जुळण्याची शक्यता असल्याने सर्वांचेच सोमवारी होत असलेल्या निकालाकडे लक्ष लागले आहे.
धाराशिव जिल्हयातील जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शनिवारी मतदान पार पडले. यावेळी साम टीव्हीच्या माध्यमातून सर्व्हे करण्यात आला होता. या 'साम टीव्ही'च्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार धाराशिव जिल्हयात सर्वच पक्षात चुरशीची निवडणूक झाल्याचे समोर आले आहे. धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 55 गट आहेत. त्यामुळे बहुमतासाठी 28 सद्स्यांचा आकडा गाठणे महत्त्वाचे आहे.
त्यानुसार धाराशिव जिल्ह्यात भाजप (BJP) सर्वात मोठा पक्ष राहण्याची शक्यता अधिक आहे. याठिकाणी भाजपचे 22 उमेदवार विजयी होण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी दोन आमदारांच्या मदतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने चांगली कामगिरी करेल, असा अंदाज आहे. त्यानुसार 14 जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळू शकतात. तर महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसला 3, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 4 असा महाविकास आघाडीचा एकत्रित आकडा 21 होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे निकालानंतर याठिकाणी मोठी चुरस पाहवयास मिळणार आहे.
दुसरीकडे या निवडणुकीत याठिकाणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. याठिकाणी बहुमताचा 28 चा आकडा भाजप व महाविकास आघाडीला एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या (Shivsena) मदतीशिवाय पार करणे अशक्य ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 11जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतर पक्षाला 2 ते 3 जागा मिळू शकतात असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.
याठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी भूम-परंडा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवली आहे. त्यामुळे या दोन तालुक्यातून 5 ते 7 जागा त्यांच्या येऊ शकतात. त्यामुळे ते भाजपसोबत महायुती करण्याची शक्यता फारच कमी आहे. दुसरीकडे उमरगा-लोहारा तालुक्यातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 3 जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे शिंदे शिवसेनेतील हे दोन्ही गट एकत्रित येऊन भाजपला पाठींबा देण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे निकालानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक, आमदार तानाजी सावंत काय भूमिका घेणार यावर बरेच काही अवलंबुन असणार आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वेगळया पॅटर्नची शक्यता
या पूर्वीच्या निवडणुकीत धाराशिव जिल्हा परिषदेत उमरगा-लोहारा विकास आघाडी अस्तित्वात आली होती. त्यावेळी काँग्रेस, शिवसेना व भाजपने एकत्रित येत त्यावेळेसच्या सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आघाडी केली होती. त्यामुळे नेमके यावेळेस काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.