

Marathwada Politics : जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. युती-आघाडी, अपक्ष, बंडखोरी, नाराजी याचा अनुभव सगळेच पक्ष घेत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सगळे चित्र आणि खरी लढत स्पष्ट होणार आहे. परभणी जिल्हा परिषदेत आतापर्यंतच्या 64 वर्षात 18 अध्यक्ष होऊन गेले. पैकी सहावेळा हा बहुमान महिला सदस्याला मिळाला होता. आता परभणीच्या मिनी मंत्रालयाचा 19 वा अध्यक्ष कोण होणार? याची उत्सूकता सगळ्यांना लागली आहे.
दीर्घ प्रशासकीय कारकिर्दीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. 19 व्या अध्यक्षाच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद सज्ज झाली आहे. ग्रामीण राजकारणाला दिशा देणाऱ्या या सत्ताकेंद्रावर कोणाचा झेंडा फडकणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. वर्ष 1962 मध्ये स्थापन झालेल्या परभणी जिल्हा परिषदेने गेल्या 64 वर्षांत ग्रामीण विकासाचे प्रमुख केंद्र म्हणून भूमिका बजावली आहे. थेट ग्रामीण जनतेशी निगडित असलेला निधी, योजना व प्रशासनामुळे जिल्हा परिषद हे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू ठरले.
त्यामुळेच जि.प.च्या अध्यक्षपदासाठी नेहमीच तीव्र राजकीय रस्सीखेच पाहायला मिळाली. 12 ऑगस्ट 1962 रोजी बाबूराव कोंडजी पाटील (गोरेगावकर) यांनी परभणी-हिंगोली संयुक्त जिल्ह्याचे पहिले अध्यक्ष म्हणून इतिहास घडविला. त्यानंतर अनेक अनुभवी नेत्यांनी या पदाची धुरा सांभाळली. काहींना पूर्ण कार्यकाळ लाभला, तर काही अध्यक्षांचे कार्यकाळ अल्पावधीचे राहिले. विशेष म्हणजे वर्ष 1980 ते 1992 या काळात तब्बल 12 वर्षे प्रशासकीय राजवट राहिली.
1992 नंतर जिल्हा परिषदेत पुन्हा लोकप्रतिनिधींचे शासन आले. या काळात सत्तांतर, अपूर्ण कार्यकाळ, प्रशासकीय हस्तक्षेपामुळे जिल्हा परिषद चर्चेत राहिली. 1998 मध्ये वनमाला खंडागळे यांच्या रूपाने जिल्हा परिषदेला पहिली महिला अध्यक्ष मिळाला. आतापर्यंत सहा महिलांनी अध्यक्षपद भूषवून ग्रामीण राजकारणात महिलांची ताकद अधोरेखित केली. वर्ष 2020 ते 2022 या कालावधीनंतर पुन्हा एकदा प्रशासकीय कारभार सुरू झाला होता.
आता अनेक वर्षांनंतर निवडणुका होत असल्याने सत्तास्थापनेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद कोणत्या राजकीय पक्षाकडे जाणार, यावर आगामी जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांची दिशा ठरणार आहे. ग्रामीण विकास, निधी वाटप, पंचायत समित्यांवरील नियंत्रण आणि आगामी विधानसभा-लोकसभा राजकारणाची नांदी म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. त्यामुळे 19 व्या अध्यक्षाची निवड ही केवळ औपचारिक नसून, जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदावरील सत्ता ही केवळ प्रशासकीय अधिकारापुरती मर्यादित नसून, ती जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाचे प्रतिक मानली जाते. त्यामुळेच पक्षीय राजकारणासोबतच अंतर्गत गटबाजी, जुने विरुद्ध नवे नेतृत्व, स्थानिक नेत्यांची महत्त्वाकांक्षा उघडपणे समोर येत आहे. थोडक्यात सांगायचे तर 19 व्या अध्यक्षाची निवड ही जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाची 'पॉवर टेस्ट' ठरणार आहे. या सत्तासंघर्षातून कोणता पक्ष किंवा गट वरचढ ठरतो, यावर केवळ जिल्हा परिषदच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याची आगामी राजकीय दिशा ठरणार आहे.
बाबूराव पाटील गोरेगावकर, बाबाराव नाईक, साहेबराव पाटील गोरेगावकर, शेषराव भरोसे, लिंबाजीराव दुधगावकर, उत्तमराव विटेकर, उत्तमराव कच्छवे दैठणेकर, वनमाला मोरेगावकर, राजेश पाटील गोरेगावकर, गवळण नागमोडे वाघाळकर, सखाराम जवादे केहाळकर, महेश फड बोरवंडकर, कुसुम देशमुख लोहगावकर, मीना बुधवंत पांगरीकर, राजेश विटेकर, उज्ज्वला राठोड, निर्मला विटेकर.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.