
Parbhani News : विधानसभाध्यक्षांनी घेतलेला निर्णय राजकीय आहे, शिंदे गटाचे आमदार पात्र आणि ठाकरे गटाचेही आमदार पात्र असा निर्णय त्यानी दिला. मग अपात्र कोण आहे? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. नार्वेकरांच्या निकालानंतर शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना मतदान करणाऱ्या जनतेलाच त्यांनी अपात्र ठरवले, असेच म्हणावे लागेल, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju shetty) यांनी लगावला.
ज्याप्रमाणे शिवसेनेचा निकाल लावला त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाही निकाल लागेल. जर त्यापेक्षा वेगळा निकाल लागला तर नार्वेकर हे जगातले सर्वात चर्चित, गाजलेले विधानसभाध्यक्ष ठरतील, असा चिमटाही शेट्टी यांनी काढला. परभणीत पत्रकारांशी बोलताना शेट्टी यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर विधानसभाध्यक्षांना चांगले टोले लगावले.
शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे (uddhav Thackrey) गटाकडून एकनाथ शिंदे यांना साथ दिलेल्या आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात विधानसभाध्यक्षांकडे याचिका करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार घेत एकनाथ शिंदे यांच्या गटाने उद्धव ठाकरे यांच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली होती. या दोन्ही याचिकांची सुनावणी घेत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला.
निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असला तरी दोन्ही बाजूकडील आमदार पात्र ठरल्याने निकालावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत नार्वेकर यांच्या निकालावर टीकास्त्र सोडले. राहुल नार्वेकर यांनी पत्रकारपरिषद घेत त्यास तातडीने प्रत्युत्तर दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही यासंदर्भात नार्वेकर यांच्या निर्णयावर टीका केली.
दरम्यान, परभणीत ऊस परिषद आणि ऊस दरवाढीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करीत शेट्टी यांनी साखर कारखान्यांवर टीका केली. परभणी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ह्या वर्षीच्या उसाला 3300 रुपये पहिली उचल द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी संघटनेने केली होती. मात्र कारखान्यांनी 2500 रुपयांची पहिली उचल जाहीर केली, ती संघटनेला मान्य नव्हती. त्यानंतर स्वाभिमानी व किसान सभा यांनी एकत्रित पाथरी तालुक्यातील लिंबा येथील योगेश्वरी साखर कारखान्यावर आंदोलन केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तेव्हा तिथे ऊसदराची कोंडी फुटली. त्यांनी 2700 रुपये प्रतिटन दर देण्याचे जाहीर केले. जी-7 शुगर, गंगाखेड यांनीही तोच भाव जाहीर केला. तुळजाभवानी शुगर, सेलू यांनी दोनशे रुपये वाढवत अंतिम दर 2600 जाहीर केला. परंतु श्री लक्ष्मी-नृसिंह शुगर, आमडापूर व ट्वेन्टीवन शुगर, सायखेडा हे दोन कारखाने मात्र दर देण्यास तयार नव्हते.
राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनात 17 जानेवारीला बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अखेर राजू शेट्टी व कारखानदार यांच्यात दोन तास चर्चा होऊन श्री लक्ष्मी नृसिंह शुगर कारखाना, ट्वेन्टीवन शुगर यांनी संवाद साधत यावर्षी तुटणाऱ्या उसाला 2700 रुपये दर देण्याचे मान्य केले. त्यानंतर आंदोलकांनी व शेतकऱ्यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.
(Edited By sachin waghmare)
R...