तुषार पाटील
भोकरदन : एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे भाजपचे नेते माजीमंत्री रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आज एकत्र दिसले. निमित्त होते भोकरदनमधील खंडोबा यात्रेत साखळदंड तोडण्याच्या कार्यक्रमाचे. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत दानवे-देशमुख यांच्यात चांगलीच जुंपली होती.
लोकसभेच्या जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या पराभवात आणि काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या विजयात राजाभाऊ देशमुख यांचा मोठा हात होता. देशमुख यांनी 'दानवे मुक्त भोकरदन' मोहिमेला काही प्रमाणत यश मिळाले, पण विधानसभेत संतोष दानवे यांनी विजयाची हॅट्रीक करत त्यांच्या मोहिमेला लगाम घातला. गेली कित्येक वर्ष तालुक्यात दानवे विरुद्ध देशमुख यांच्यात राजकीय संघर्ष सुरु आहे. पण आज भोकरदन येथे खंडोबा मंदिरात हे दोन्ही नेते एकत्र आणि एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले.
हे चित्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या, तर काहीजण सुखावले. मात्र हा योगायोग आहे, यात कुठलेही राजकारण नाही, आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद आहेत, वैयक्तिक नाही,असे सांगत दोघांनी यावर अधिक बोलणे टाळले. (Congress) भोकरदन शहरातील खंडोबा महाराज यात्रा उत्सवात रावसाहेब दानवे यांनी शनिवारी सायंकाळी हजेरी लावली.
चंपाषष्ठीला सायंकाळी साखरदंड (लंगर) तोडण्याचा कार्यक्रम असतो. यावेळी वाघ्या मुरळी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी रावसाहेब दानवे यांनी मंदिरात हजेरी लावली व लंगर तोडण्याचा कार्यक्रम मंदिराच्या पायरीवर बसून अनुभवला. योगायोगाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि तालुक्यातील नेते राजाभाऊ देशमुख हे देखील या धार्मिक पंरपरेचा वारसा असलेल्या सोहळ्याला हजर होते.
दोघेही सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे मंदिराच्या पायरीवर बसून यात्रोत्सवाचा आनंद घेताना दिसले. या दोन कट्टर राजकीय विरोधकांच्या एकत्र येण्याने राजकीय वर्तुळात चर्चा होणार नाहीतर नवलच. सोशल मिडियावर या दोघांचे एकत्रित फोटो व्हायरल झाले आणि चर्चांना उधाण आले. मात्र या भेटीचे कोणीही राजकीय अर्थ काढू नये असे स्पष्ट केले.
गावाच्या उत्सवात किंवा कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात राजकीय जोडे बाजूला ठेऊन मी एक भक्त म्हणून सहभागी होतो. विरोधक जरी असला तरी त्याच्याशी आपले वैर हे राजकीय मताविषयी व राजकीय भूमिकेविषयी असते. ही महाराष्ट्राचे राजकीय संस्कृती आहे. आम्ही एकत्र आलो असलो तरी आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. आम्ही दोघेही या कार्यक्रमात भक्त म्हणूनच सहभागी होतो. सोबत बसणे हा फक्त योगायोग होता, यापेक्षा अधिक काही नाही, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.