
Beed Politics : तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विभागामार्फत खरेदी करण्यात आलेल्या साहित्य खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर पुराव्यासहित आरोप केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. परंतु साहित्य खरेदीत कुठलाही घोटाळा झाला नसल्याचे सांगत न्यायालयाने धनंजय मुंडे यांना क्लीन चीट दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील घरवापसीचे संकेतही दिले.
एकीकडे धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री करण्याचे प्रयत्न सुरू असताना भाजपाचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. धनंजय मुंडे यांना न्यायालयाने एका खरेदी प्रकरणात क्लीन चीट दिली असेल, पण ते मंत्री असताना त्यांच्या कृषी खात्यात 169 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा दावा धस यांनी पुन्हा केला आहे. कृषी खात्यातील अधिकाऱ्यांनीच तब्बल 78 बोगस कंपन्या स्थापन करत खतांचे लिंकिंग केले, ते खरेदी केले, असा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
सुरेश धस यांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. त्यांना मंत्रिमंडळात परत घेऊ नका, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यातच सुरेश धस यांनी नव्याने कृषी खात्यातील घोटाळ्याचा दावा करत एसआयटीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना धस यांनी धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्याच्या बैठका आका, म्हणजेच वाल्मिक कराड हाच घेत होता, असा आरोप केला आहे.
कृषी खात्यामध्ये 169 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत धस यांनी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्रा देसाई यांना पत्र दिले आहे. हा घोटाळा तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात झाल्याचा आरोपही धस यांनी केला. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनीच 78 कंपन्या स्थापन केल्या आणि खतांचे लिंकिंग मोठ्या प्रमाणात करण्यात आले. खतांचं लिंकिंग करण्याचं पाप या लोकांनी केले आहे, याची एसआयटी चौकशी होणे गरजेचे आहे.
माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे कृषी विभागातील या घोटाळ्याची चौकशी करण्याची विनंती करण्यात आली आहे. एका प्रकरणात क्लीन चिट मिळाली असली तरी, मधल्या काळातील अनेक मोठी प्रकरणे असल्याचा दावा धस यांनी केला. खरेदीच्या बाबतीत निर्णय मिळाला असला तरी, मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली आहे. डीबीटीचा निर्णय डावलून अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. ज्या अधिकाऱ्यांनी कंपन्या स्थापन केल्या, त्यांच्याकडूनच खते विकत घेऊन महाराष्ट्रात खताचे लिंकिंग मोठ्या प्रमाणावर झाले.
या सगळ्याची स्वतंत्र एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी, आपण केल्याचे सुरेश धस यांनी सांगीतले. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या चौकशी अधिकार्यांवर आपला आक्षेप असल्याचे ते म्हणाले. वाल्मिक कराड याचाही या घोटाळ्यात सहभाग आहे, कारण कृषी खाते धनंजय मुंडे यांच्याऐवजी आका आणि त्याचे लोकच चालवायचे. सगळ्या बैठकाही तेच घ्यायचे, असा आरोपही धस यांनी केला. ही सर्व प्रकरणे धनंजय मुंडे यांच्याच कार्यकाळातील आहेत आणि कृषी खाते कोण चालवत होते हे सगळ्यानाच माहित आहे, असेही धस म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.