
Marathwada Political News : नांदेड हा तेलंगणातील राजकीय पक्षांसाठी लाँचिंग पॅड ठरत आहे. हैदराबाद-नांदेड मार्गे महाराष्ट्र असा एमआयएमचा राज्यात विस्तार झाला. (BRS News) नांदेड जिल्ह्याच्या सीमा तेलंगणा राज्याशी लगत असल्याने नांदेड जिल्हा तिकडच्या पक्षांना जवळचा वाटतो. भौगोलिक, भाषिक जवळीकता असल्याने पक्षाचा विस्तार होण्यासाठी या पक्षांना इथे मदतही झाली. याचा कित्ता गिरवत भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाच्या लाँचिंगसाठी नांदेडची भूमी निवडली.
बीआरएसची पहिलीच जाहीर सभा नांदेडमध्ये झाल्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यांत के. चंद्रशेखर राव (K.Chandrashekhar Rao) आपला पक्ष आणि तेलंगणा पॅटर्न घेऊन गेले. त्यांच्या सभांना गर्दी आणि तेलंगणा पॅटर्नची चर्चा यामुळे महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना बीआरएसची दखल घ्यावी लागली. (Nanded) नांदेडची सभा होऊन सहा महिने झाल्यानंतर तेलंगणा राज्यात राबविण्यात येणाऱ्या शेतकरी व कल्याणकारी योजनांचे एक गुलाबी चित्र नागरिकांसमोर मांडले जात आहे.
महाराष्ट्र आणि विशेषतः मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नापिकी, सततचा दुष्काळ या प्रश्नावर काम करण्याची भरपूर संधी असल्याचे लक्षात येताच चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाला विस्तारण्यासाठी लगतच्या नांदेड आणि महाराष्ट्राची निवड केली. (Maharashtra) पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्र्यांनी जिल्ह्यातील विविध भागात फिरून पक्षाची भूमिका जनतेसमोर मांडली. इतर पक्षांतील नाराज पदाधिकारी कार्यकर्त्यांना हेरून पक्षात प्रवेश दिले, त्याचे सोहळेही केले.
वातावरण निर्मिती करण्यात यश आलेल्या बीआरएसला राज्यातील मोठे नेते मात्र गळाला लावता आले नाही. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्री पदाची आॅफर देत बीआरएसने राज्यात स्वतःची चर्चा तर घडवून आणली, पण हा त्यांचा पब्लिसिटी स्टंट होता हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे सध्या तरी या पक्षाची सगळी भिस्त आयात केलेल्या इतर पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांवरच असणार आहे. लोकसभा निवडणूक सहा-सात महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना बीआरएसची ही अवस्था असल्याने `किसान सरकार`आण्याची त्यांची वाट बिकट मानली जात आहे.
जिल्ह्यातील स्वपक्षातील नेत्यांवर, पदाधिकाऱ्यांवर नाराज असलेले कार्यकर्ते व पदाधिकारी बीआरएसची वाट धरत असले तरी ते पक्षाला मोठे यश मिळवून देऊ शकतील का? हा खरा प्रश्न आहे. चंद्रशेखर राव यांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश आपल्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे या पक्षाच्या राज्यातील राजकीय प्रवेशाची सुरुवात जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनच होऊ शकते.
पक्षाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवण्याची तयारी सुरू केल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. पण या घोषणेची चर्चा काही दिवसांतच संपली. माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे, सुरेश गायकवाड, काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर, डॉ. यशपाल भिंगे, नागनाथ घिसेवाड, प्रवीण जेठेवाड, संतोष गव्हाणे या जिल्ह्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी बीआरएसची वाट धरली आहे.
कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे यांनी शेतकरी मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शनही केले. त्यांचे या मतदारसंघात खूप मोठे काम आहे. पण पक्षवाढीसाठी लागणारे केडरबेस कार्यकर्ते, पक्षाचे ध्येयधोरणे लोकांपर्यंत नेण्यासाठी मजबूत संघटना बांधणी होताना दिसत नाही. केवळ इतर पक्षांतील कार्यकर्ते कसे आपल्या पक्षात आणता येतील हा एकमेव कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
पक्षाने समाजातील वंचित घटक, अल्पसंख्याकांवर लक्ष ठेवून काम सुरू केले आहे. तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवा, सुविधा विविध कल्याणकारी योजना याविषयी माहिती देऊन एक गुलाबी चित्र रंगविण्यात येत आहे. पण या योजनेचा जिल्ह्यातील नागरिकांना काय फायदा होणार आहे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बीआरएस भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचा प्रचार विरोधकांकडून केला जात आहे. आगामी काळात तेलंगणा राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत बीआरएसचे काँग्रेस, भारतीय जनता पक्ष हे प्रमुख प्रतिस्पर्धी राहणार आहेत. या निवडणुकीच्या निकालाचा बरा वाईट परिणाम बीआरएसच्या जिल्ह्यातील पक्षवाढीसाठी होईल. सध्या तरी आयात केलेल्या नेत्यांवरच या पक्षाची भिस्त आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.