Chhatrapati Sambhajinagar News : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अन् उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना छत्रपती संभाजीनगरच्या पाणीप्रश्नावर तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेवर जल आक्रोश मोर्चा काढला होता. 23 मे 2022 रोजी या मोर्चाला मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगरमधील पाण्याचा जो सत्यानाश झाला त्याला शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप केला होता. आता तीन वर्षांनी देवेंद्र फडणवीस पुन्हा आले, मुख्यमंत्री झाले. पण संभाजीनगरकरांच्या पाण्याचा प्रश्न जैसे थे आहे.
याच मुद्यावर आता माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात फडणवीस सरकारच्या विरोधात संभाजीनगरमध्ये पुन्हा पाण्यासाठी मोर्चा काढण्याची जोरदार तयारी सुरू आहे. ' लबाडांनो पाणी द्या' म्हणत एक-दोन नव्हे तर तब्बल महिनाभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पाणीप्रश्नावर शहरात आंदोलन केले जाणार आहे. घराघरात पत्रके वाटून पाणीप्रश्नाला सत्ताधारीच कसे दोषी आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न पुढील महिनाभरात केला जाणार आहे.
आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मे महिन्यातच पाण्यासाठी शिवसेना मोर्चा काढून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संभाजीनगरकरांची कशी फसवणूक केली आहे, हे सांगणार आहे. एकूणच कडक उन्हाळात्यात शहरवासियांच्या घशाला जेव्हा कोरड लागलेली असले, तेव्हा राजकीय पक्षांचे नेते मात्र मोठ्याने ओरड करणार आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या या राजकारणात संभाजीनगरकर मात्र तहानलेलेच राहतात की काय? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पन्नास किलोमीटर अंतरावर पाण्याने भरलेले जायकवाडी धरणं असले तरी समांतर जलवाहिनी नसल्यामुळे संभाजीनगरकरांना 10-ते 12 दिवसांनी नळातून पाणी मिळते. विशेष म्हणजे महापालिकेतील ज्या सत्ताधाऱ्यांवर ते देण्याची जबाबदारी होती तेच शिवसेना-भाजप पक्ष आता वेगळे झाल्यानंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून खापर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेना-भाजप या दोन पक्षांची महापालिकेवर पंचवीस वर्ष सत्ता होती. मग पाणीप्रश्नाचा जाब हेच दोन पक्ष एकमेकांना कसे विचारू शकतात? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 23 मे 2022 रोजी ‘जल आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. इतकी वर्षे सातत्याने महापालिकेत सत्ता असूनही संभाजीनगरमध्ये पाण्याचा जो सत्यानाश शिवसेनेच्या काळात झाला, त्याची फळं औरंगाबादकर भोगत आहेत, अशी टीका त्यांनी केली होती. मुख्यमंत्री म्हणतात मी संभाजीनगर म्हणतो तर समजून जा. मला असं वाटतं आता पाणी मगायला गेलं तर काय म्हणतील?'दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा'अशा शब्दात फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
पाण्यासाठी त्राहीमाम...
संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी त्राहीमाम चालला आहे. थेंब थेंब पाण्यासाठी संभाजीनगरचा माणूस तरसतोय, त्यावेळी भाजप शांत बसणार नाही. मी इशारा देतो ज्यावेळी संभाजीनगरमध्ये पाणी पोहोचेल त्याच वेळी हा संघर्ष संपेल. तोवर आम्ही तुम्हाला स्वस्थ झोपू देणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी तेव्हा दिला होता. आम्ही पाण्यासाठी समांतर योजना आणली. सगळी योजना यांनी खाऊन टाकली, असा आरोपही फडणवीस यांनी शिवसेनेवर केला होता.
आता देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याच काळात मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना सात वर्ष उलटली तरी पूर्ण झाली नाही. योजना रखडण्याचे खापर फडणवीस यांनी तेव्हा महाविकास आघाडी सरकार व त्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फोडले. आता पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री आहेत, पण नळातून काही पाणी आलेले नाही. यावर 'लबाडांनो पाणी द्या' म्हणत उद्धव ठाकरे यांची सेना फडणवीसांना घेरण्याच्या तयारीत आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.