
Sangli News : सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला प्रवेश करता आला नव्हता. पण विधानसभा निवडणुकीवेळी भाजपसोडून राष्ट्रवादीत आलेल्या दोन दिग्गजांमुळे राष्ट्रवादीला आत्ता चांगले दिवस येताना दिसत आहे. याचा फायदा येत्या आगामी स्थानिकमध्येही होईल. नुकताच जिल्हाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतलेल्या निशिकांत पाटील यांनी अज्ञातवासात गेलेल्या माजी खासदार संजयकाका पाटील यांना देखील आपल्या सोबत घेतले आहे. तसेच त्यांच्या पुनर्वसनाचे वक्तव्य करत हात वर केलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील शिंगावर घेण्याची तयारी केली आहे. यामुळे आता आगामी काळात भाजप सोडून राष्ट्रवादीत आलेले निशिकांत पाटील आणि संजयकाका पाटील हे दोन नेते भाजपला शह देण्याचे काम करतील. ते जिल्ह्यात राष्ट्रवादी मोठी करतील असेच चित्र पाहायला मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी संजयकाका यांना यश आले नाही. त्यानंतर विधानसभेसाठी आग्रही असणाऱ्या संजयकाकांना भाजपने तिकीट देण्याऐवजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वाट दाखवली. मात्र त्यावेळीही त्यांना यश आले नाही. नवख्या रोहित पाटलांनी त्यांचा पराभव केला. यानंतर ते अद्यापही राष्ट्रवादीशी जुळलेले नव्हते.
संजयकाका यांनी अनेकदा भाजपबरोबर जाण्याचा प्रयत्न केला होता. तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील त्यांच्या घरी जाऊन भेट दिल्याने संजयकाका यांची घरवापसी होईल अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र नंतर राजकारणातले वासे फिरले आणि चंद्रकांत पाटील यांनी संजयकाका यांच्यासाठी भाजपचे दरवाजे बंद असल्याची घोषणा केली. फक्त घोषणाच केली नाही तर त्यांनी अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यासाठी पायघड्या घातला. त्यांना एक नाही तीन तीन वेळी भाजपची ऑफर दिली. तसेच ही ऑफर कायम स्वरूपी असल्याचेही जाहीर केले. यामुळे भाजपविरोधात सध्या संजयकाका यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राग आहे.
अशातच नुतन जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी भाजपला टोला लगावताना संजयकाका यांचे पुनर्वसन करावे, इतके ते छोटे नाहीत. ते प्रमुख नेते आहेत. ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढले असून आम्ही सारे एक असल्याचे म्हटलं आहे. यामुळे राष्ट्रवादी पासून दुरावलेल्या संजयकाकांनाही आपलं अस्तित्व असल्याची जाणीव झाली आहे. याच गोष्टीचा संजयकाका आपल्या फायद्यासह राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी करतील. विधानसभेवेळी संजयकाका पाटील यांना 99 हजार मतदान झाले होते.
असाच फटाका भाजपला निशिकांत पाटील यांच्यामुळे देखील बसण्याची शक्यता आहे. निशिकांत पाटील यांनी देखील भाजपला रामराम करूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2024 मध्ये तब्बल तब्बल 90 हजार मते मिळवली होती. त्यावेळी जयंत पाटील यांचा निसटता विजय झाला होता. त्यांना फक्त 13 हजार मतांचे लिड मिळाले. या लढतीत फक्त निशिकांत पाटील यांचीच ताकद नव्हती तर भाजपची देखील मदत झाली होती. पण आता भाजपमध्ये नसून पूर्णपणे राष्ट्रवादीचे आहेत. त्यातच त्यांना जिल्हाध्यक्षही करण्यात आल्याने ते स्थानिकची घोषणा होताचा अॅक्टिव्ह झाले आहेत.
तसेच त्यांनी कधीकाळी भाजपसोबत असणाऱ्या माजी आमदारांसह इतर पक्षातील माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला. यामुळे त्यांची ताकद अजित पवार यांनी हेरली आहे. त्यांच्यावर आता ग्रामीणची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली असून त्यांनी पूर्ण लक्ष पक्ष बांधणीकडे दिले आहे.
याचाच एक भाग म्हणून निशिकांत पाटील यांनी संजकाकांसह जे पक्षापासून दुरावले आहेत. त्यांना पुन्हा पक्षात आणण्याचे काम सुरू केले आहे. तसेच जिल्ह्यात पक्षाची मजबूत बांधणी सुरू करण्यासाठी सुमारे सव्वा लाख सभासद नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. तसेच त्यांनी या निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवून देऊ आणि सांगली जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनवू, असा विश्वासही व्यक्त केला आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला लागले यश मिळेल असेही बोलले जात आहे. तर निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या मजबूत बांधणीसाठी सुरू केलेली खेळी भाजपच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे. ज्याला संजयकाकाच बळ देतील असेही आता चर्चा सांगलीत रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.