
Sangli News : सांगलीत जयश्री पाटील यांनी काँग्रेससह अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यासह विश्वजीत कदम यांना जोरदार धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर होत्या पण त्यांच्या गाडीची चाकं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपकडे वळवली आणि प्रवेश देखील घडवून आणला. यानंतर सांगलीत आता जोरदार राजकीय वाद सुरू झाला आहे. विशाल पाटील यांनी भाजपने वसंतदादा पाटील यांचे घर फोडलं, अशी जोरदार टीका केली होती. ज्यावर आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी, पलटवार करताना भाजपने वसंतदादा पाटील यांचे घर फोडलं नाही. विशाल पाटील यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हणत त्यांना लोकसभेतील विजयाची लॉटरी कशी लागली, ते उघडपणे सांगू शकत नाही, असा टोला लगावला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. यामुळे आता सांगलीच्या राजकीय वर्तुळात या सूचक वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Chandrakant Patil responds to Vishal Patil’s allegation on BJP breaking their political family)
काँग्रेसच्या बंडखोर नेत्या तथा जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील (Jayashree Patil) यांनी भाजप प्रवेश केला. ज्यानंतर विशाल पाटील (Vishal Patil) यांनी भाजपला अंगावर घेतलं होते. त्यांनी प्रवेशानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपवर तोफ डागली होती. तर सोलापूरमध्ये देखील खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थित एका कार्यक्रमात भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी, विशाल पाटील यांच्या आरोपावर खुलासा करताना, विशाल पाटील यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हटलं आहे. तसेच विशाल पाटील यांची ताकदच होती, तर मागच्या लोकसभा निवडणुकीत ते का पराभूत झाले? प्रत्येक वेळी परिस्थिती बदलते. या वेळी बदलली आणि ते विजयी झाले; पण मी अपक्ष खासदार झालो म्हणजे राजा झालो, अशी भावना त्यांच्यात तयार झाली आहे. ते सर्वच विषयांत टिप्पणी करू लागले आहेत; पण त्यांना ही लॉटरी कशी लागली हे मी उघड सांगू शकत नाही.
जयश्री पाटलांवर काँग्रेसने अन्यायच केला. विधानसभा निवडणुकीला उमेदवारीवर जयश्री पाटील यांचाच दावा होता. पण काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिलीच नाही. उलट पक्षातून काढून टाकले. बंडखोरी झाली की निवडणुकीनंतर महिन्याभरात एखाद्याला परत पक्षात घेतले जाते. मात्र जयश्रीताईंबाबत काँग्रेसमध्ये वेगळचं घडलं. त्यांना परत घेण्याचे नाव न घेतल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
जयश्री पाटील यांनी भाजपच्या दबावाखाली निर्णय घेतला, असे विशाल पाटील आरोप करत आहेत. पण त्यांचे असे म्हणणे चुकीचे आहे. त्यांना (जयश्री पाटील) काही कळत नाही, असे खासदार विशाल पाटील यांना वाटते का? त्या वयाने लहान नाहीत की, त्यांना कोणीतरी चुकीचे मार्गदर्शन केलं असावं. अन् त्यांनी निर्णय घेतला. त्या याबाबत खूप दिवस विचारमंथन करत होत्या, कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या आणि त्यानंतर हा निर्णय झाला.
दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी हिंदी सक्तीवरून केवळ भुई थोपटण्याचे काम चालल्याचे सांगत विरोधकांना फटकारलं आहे. ते म्हणाले, केंद्र शासनाचाच तीन भाषा शिकवण्याचा प्रस्ताव आहे. हिंदी विषयाची सक्ती केलेली नाही. मराठी भाषेवरून राजकारण करणाऱ्यांची मुले कोणत्या शाळेत, कोणत्या माध्यमात शिकताहेत हे जरा त्यांनी जाहीर करावे, असे आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिलं
विशाल पाटील यांनी, सोलापूर येथील मेळाव्यात भाजपने आमच्याही घरात फूट पाडली. आमच्या घरातील एका वहिनींना (जयश्रीताई पाटील) भाजपने फूट पाडण्यासाठी पक्षात घेतले. आमचे (सांगलीचे) पालकमंत्री रोज भाषण करतात की, विशाल पाटलांना आम्ही घेणार आहे. पण मी अपक्ष निवडून आलो आहे. भाजपच्या दोन टर्म निवडून आलेल्या खासदाराला पाडून मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे. मी जरी अपक्ष असलो तरी काँग्रेसच्या विचारांचा आहे. त्यामुळे मी काँग्रेसचाच आहे. त्यामुळे आमचं काही व्हायचं आहे ते होऊ द्या. आम्हाला तुरुंगात जायला लागलं, अडचणीत यायला लागलं, तरी असले दहा-वीस विशाल पाटील तुमच्यातून तयार होतील. आमची काँग्रेससोबत थांबयाची क्षमता आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटलांची ऑफर विशाल पाटलांनी फेटाळून लावली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.