अहमदनगर - भारतीय जनता पक्षाच्या उत्तर नगर जिल्हा कार्यकारीणीची महत्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याबैठकीत भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्वाच्या पार्श्वभूमिवर उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. ( Convince the people of the fraud committed by the three parties )
या बैठकीला माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी आमदार वैभव पिचड, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, उपाध्यक्ष अॅड. रघुनाथ बोठे, नितीन कापसे, सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, सुनील वाणी, नंदकुमार जेजूरकर, श्रीराज डेरे, सतीश कानवडे, आसिफ पठाण, विठ्ठल राऊत, बाळासाहेब गाडेकर, डॉ. महेंद्र कोल्हे, शिरीष मुळे आदी उपस्थित होते.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, केंद्र सरकारच्या 78 योजनांचा लाभ समाजातील विविध घटकांना मिळाला आहे. प्रत्येक लाभार्थ्याशी संवाद साधून मन की बात करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे ही योजना आपल्यापर्यंत आल्याचे घरोघरी जावून सांगा. या सरकारच्या मर्मावर बोट ठेवून तीन पक्षांनी केलेली फसवणूक जनतेला पटवून द्या, असे आवाहन विखे पाटील यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, सेवा सुशासन आणि गरीब कल्याणपर्व हा पंधरा दिवसांचा कार्यक्रम खऱ्याअर्थाने केंद्र सरकारच्या योजनांचा जागर करण्याचा कार्यकाळ आहे. पंतप्रधान मोदींनी समाजातील सर्वच घटकांना डोळ्यासमोर ठेवून योजनांची केवळ घोषणाच केली नाही तर, प्रभावी अंमलबजावणी केली. समाजातील प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या योजनेचा लाभार्थी ठरला आहे. या लाभार्थ्यांशीच आता तुम्हाला संवाद करायचा आहे. दर महीन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याशी मन की बात करतात अशाच प्रकारची मन की बात आता लाभार्थ्यांशी जावून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करायची असल्याचे त्यांनी सुचित केले.
केंद्र सरकारमुळे आज कृषी उत्पादीत मालाला मोठ्या प्रमाणात भाव मिळू लागला आहे. आज कापूस 14 हजार रुपये क्विंटलने तर सोयाबीन 12 हजार रुपये क्विंटलने विकले जात आहे. प्रथमच एवढा भाव कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना मिळाला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे मोदींचे उदिष्ट हे या माध्यमातूनच सिध् होत असल्याचे सांगून केंद्र सरकारमुळेच या देशातील शेतकऱ्याला मोठा आधार मिळाला आहे. दुसरीकडे मात्र राज्यातील आघाडी सरकार कोणतीही मदत करु शकलेले नाही. आघाडी सरकारचे हे अपयश जनतेसमोर जावून मांडण्याची संधी या पर्वाच्या निमित्ताने तुम्हाला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड काळात मंत्र्याच्या तालुक्यातही नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. मृत्यूची आकडेवारी लपविली गेली. राज्य सरकारने लस देण्यामध्येही फसवणूक केली. धान्याची उपलब्धता केंद्राने करुन दिली. त्याचे श्रेयही महाविकास आघाडी सरकार घेत आहे. हीच बाब तुम्हाला आता नागरिकांच्या लक्षात आणून द्यायची आहे. याकरीता प्रत्येक तालुक्यात केंद्र सरकारने मदत आणि योजनांच्या रुपाने दिलेला निधी व महाविकास आघाडीमुळे जनतेचे झालेले हाल पुस्तिकेच्या रुपाने समोर आणा असे आवाहनही त्यांनी केले.
वैभव पिचड म्हणाले की, कोणत्याही गरीब माणसाला मिळालेल्या योजनेचा लाभ तो आयुष्यभर लक्षात ठेवतो. हीच आठवण आता भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करुन द्यायची आहे. केंद्र सरकार आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून कार्यकर्त्यांनी काम करावे असे आवाहन करुन, आघाडी सरकारमुळे आदिवासी, दूध उत्पादक शेतकरी यांची घोर फसवणूक झाली आहे. स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य मिळू नये म्हणून प्रयत्न सुरु झाले आहेत. वाहतुकदारांचा पगार केला नसल्यामुळे धान्य मिळण्यात अडचण निर्माण होत असल्याची बाब त्यांनी बैठकीत उपस्थित केली.
जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी अगामी पंधरा दिवसात भाजपाच्या सर्व आघाड्यांच्या वतीने तालुका निहाय कार्यक्रमाचे नियोजन करुन, हे गरीब कल्याणपर्व यशस्वी करण्याचे आवाहन केले. संघटन सरचिटणीस नितीन दिनकर यांनी सर्व आघाड्यांच्या जिल्हाध्यक्षांकडून कार्यक्रमाचा आढावा घेतला. सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्वाची माहिती जालिंदर वाकचौरे यांनी दिली. पदाधिकाऱ्यांनी बैठकी महत्वपूर्ण सूचना केल्या.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.