
Sangli News : नागपूर ते गोवा द्रुतगती शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मोठी विरोध आहे. येथे दोन्ही जिल्ह्यात आता आंदोलनाची धार वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि काँग्रेस नेते सतेज पाटील प्रयत्न करत आहेत. पण आता बाधित क्षेत्रातील आमदारांची भूमिका ही गोंधळाची स्थिती आहे. तर आमदार सुधीर गाडगीळ, तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील, खानापूरचे आमदार सुहास बाबर यांनी महामार्गाबाबत सावध भूमिका समोर येत आहे. यामुळे सांगलीत नुकताच आंदोलन झाल्याने अपक्ष खासदार खासदार विशाल पाटील यांची भूमिका स्पष्ट दिसत आहे.
शक्तिपीठ महामार्गाला दोन पातळ्यांवर विरोध केला जातोय. एक भूमिका ही महामार्ग रद्दच झाला पाहिजे, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर महामार्ग कशासाठी करत आहात, अशा दिशेने जाणारी आहे. दुसरी भूमिका शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, रेडीरेकनरच्या चारपट भरपाई मिळाली पाहिजे, अशा स्वरूपाची आहे. शक्तिपीठ महामार्गाला कुणाचा विरोधच नाही, असे सांगत आमदार गोपीचंद पडळकर यांनी राळ उठवून दिली आहे.
आंदोलनात बाधित शेतकरी कुठे आहेत, असा सवालही महामार्गाचे समर्थन करणारा गट करत आहे. या गोंधळात आमदार आणि खासदारांच्या भूमिकेत स्पष्टता दिसत नाही, याचीही लोकांमध्ये आता चर्चा सुरू आहे. खासदार विशाल पाटील यांनी अगदी सुरुवातीच्या टप्प्यात शक्तिपीठ महामार्गाला थेट विरोध करत तो रद्द करण्याची मागणी केली होती. अलीकडे भूमिका थोडी सौम्य झाली आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घ्या, रेटून काही करू नका, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. ते शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी बैठका घेणार आहेत.
आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रारंभी या महामार्गाच्या विरोधातील आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आता त्यांनी ‘थांबा आणि शांत राहून पाहा’, अशी भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ हा उचलून धरलेला मुद्दा असल्याने पक्ष जी लाईन घेईल त्याच्याशी ते अनुकूल राहतील, असे चित्र आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनीही अलीकडे या आंदोलनापासून दूर राहण्याचे धोरण अवलंबल्याचे दिसते. त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जमीन अधिग्रहण होणार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. लवकरच ते भूमिका स्पष्ट करतील.
आमदार सुहास बाबर यांच्या मतदारसंघात शेटफळे येथून जमीन अधिग्रहण सुरू झाले. तेथे शेतकरी आक्रमक झाले. या परिस्थितीत बाबर कोणाच्या बाजूने, हे स्पष्ट झाले नाही. त्यांनी प्रारंभी महामार्गाला विरोध न करता तो खानापूरमार्गे नेण्याची वेगळीच मागणी पुढे आणली. बागायती क्षेत्र वगळून महामार्ग शक्य तेथे रत्नागिरी-नागपूर महामार्गाला जोडावा, असेही म्हटले होते. वास्तविक, या दोन महामार्गांच्या मांडणीत मोठा फरक आहे. हा द्रुतगती महामार्ग असून, दोन्ही बाजूंनी बंदिस्त असणार आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेत आता काय बदल होतो, हे पाहावे लागेल.
शक्तिपीठ महामार्ग हा अत्यंत तापलेला मुद्दा असून त्यावर सरकार मात्र शक्तिपीठबाबत ठाम आहे. त्यामुळे हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात चर्चेला येण्याची शक्यता आहे. त्यात सांगली जिल्ह्यातील सर्व आमदार काय भूमिका मांडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.