Radhakrishna Vikhe Patil : राज्यात शिंदे गट व भाजपचे सरकार आले आहे. नुकताच मंत्रीमंडळ विस्तार झाला. महाविकास आघाडीकडून राज्यातील नवीन मंत्र्यांवर टीका होत आहे. या टीकेला राज्यातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांच्या समवेत खासदार डॉ. सुजय विखे पाटील होते.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पकतेमुळे देशभर सुरू झालेल्या हर घर तिरंगा हर मन तिरंगा उपक्रमात राज्यात स्वातंत्र्य उत्सव साजरा होत आहे. जिल्ह्यात येताना मनस्वी आनंद होत आहे. राज्यात जनतेच्या मनातील सरकार आले आहे. त्यामुळे जनतेने व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी साईबाबांनी आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, जनतेचे सरकार आले असल्याने विरोधाकांनी वैफल्यातून केलेल्या टीकेला महत्त्व देण्याची गरज नाही. जनतेच्या अपेक्षा हे सरकार निश्चित पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे सरकार विश्वास घाताने महाराष्ट्रात आले होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेनी युती केली होती. नंतर शिवसेनेने विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी जनाधार न मिळालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जात सरकार स्थापन केले. त्यांचे सरकार विश्वासघाताने आले होते. याची आठवण जयंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना ठेवण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
बाळासाहेब थोरातांकडून होत असलेल्या टीकेवर ते म्हणाले, त्यांच्या टीकेकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. मागील काही वर्षांत ते मंत्री होते. आताही होते. राज्याचे मंत्री असताना ते संगमनेर पलिकडे गेलेच नाहीत. सत्ता गेल्यावर त्यांना गाव आठवू लागले आहे. सत्ता गेल्यावर तरी त्यांना आपल्या लोकांची आठवण झाली याचा मला आनंद आहे.
महसूल मंत्रीपदा संदर्भात म्हणाले...
हा निर्णय पक्ष नेतृत्त्वाने घ्यायचा असतो. नेतृत्त्व योग्य निर्णय घेईल असा आम्हाला विश्वास आहे. राज्यात मंत्रीमंडळ आता तयार झाले आहे. राज्यातील नैसर्गिक आपत्तीचा आढावा आम्हाला घेऊ द्या. शेतकऱ्यांना मदत करण्याचा मोठा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. ज्यांनी जनतेच्या पैशाचा भ्रष्टाचार केला आहे. त्याची उत्तरे त्यांना द्यावीच लागतील, असे त्यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.