
Kolhapur/Sangli/Solapur News : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. आता महायुती सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांत विकास प्रकल्पांना गती देण्याचे धोरण फडणवीस यांनी हाती घेतले आहे. त्याप्रमाणे 'तालुका तेथे बाजार समिती'चा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील 21 जिल्ह्यांत 65 तालुक्यांच्या ठिकाणी नव्याने बाजार समित्यांची स्थापणा होणार आहे. पण या निर्णयाचा थेट फटका आता कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील संचालकांवर होण्याची शक्यता आहे. यामुळे येथील बाजार समितीतील संचालकांनी सरकारशी असहकाराची भूमिका घेतली आहे. तर सभापतींसह संचालकांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
राज्य सरकारने 'तालुका तेथे बाजार समिती'चा निर्णय घेतल्याने सांगलीतच तीन नव्या स्वतंत्र बाजार समिती स्थापन होणार आहेत. यामुळे येथील दुष्काळ पट्ट्यावर पुन्हा एकदा अन्याय होणार असल्याची तक्रार येथील बाजार समितीचे सभापतींसह संचालक मंडळाने केला आहे. तर आता याविरोधात सर्व संचालक विरोधाच्या भूमिकेत आहेत.
दरम्यान सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील बाजार समित्यांच्या सभापतींशी संपर्क साधला आहे. त्यांनी कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील बाजार समित्यांच्या सभापतींही विभाजनाला विरोध दाखवला आहे. यामुळे आता सांगलीसह कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सभापतीसह सर्व संचालक या निर्णयाविरोधात एकत्र आले आहेत. सांगलीसह कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांची एकत्रित याचिका दाखल करण्याची तयारी सुरू आहे. याबाबत तिन्ही जिल्ह्यांतील सभापतींची लवकरच बैठक होणार आहे.
राज्य सरकारने प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून याबाबत मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे सांगली बाजार समितीचे विभाजन होणार असून जत, कवठेमहांकाळ आणि मिरज अशा स्वतंत्र बाजार समित्या होणार आहेत. सांगली बाजार समितीप्रमाणे कोल्हापूर आणि सोलापूर बाजार समित्यांचे त्रिभाजन होणार आहे. तेथील परिस्थिती सांगलीप्रमाणे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळ नाराज झाले आहे. कोल्हापूर येथे भाजप नेत्यांनी करवीरसाठी स्वतंत्र बाजार समितीचा घाट घातला आहे, तर सोलापुरातील संचालक त्रिभाजनाच्या विरोधात पुढे आले आहेत.
सांगली बाजार समितीचे विभाजन होणार असून जत, कवठेमहांकाळ आणि मिरज अशा स्वतंत्र बाजार समित्या होणार आहेत. यामुळे दुष्काळी भागातील संचालकांसह नेत्यांकडून तीव्र विरोध होताना दिसत आहे. स्वतंत्र बाजार समिती झाल्यास दुष्काळी आणि उत्पन्नाचे स्रोत कमी असलेल्या जत आणि कवठेमहांकाळ उपबाजार आवार बंद पडतील. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी संचालक मंडळ आणि नेते आक्रमक झाले आहेत.
दरम्यान सरकारच्या या निर्णयाविरोधात सांगलीसह कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील सभापती आणि संचालकांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सभापती सुजय शिंदे यांनी दिली आहे. तसेच विभाजनाविरोधात तिन्ही जिल्ह्यांनी एकत्रित याचिका दाखल करण्याबाबतची प्राथमिक चर्चा झाली आहे. आता यावर लवकरच सभापती आणि संचालकांची बैठक होईल. त्याप्रमाणे न्यायालयात जाण्यासह शासनस्तरावरही पाठपुरावा केला जाईल असेही सभापती सुजय शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.