

Solapur, 13 March : पंढरपूर पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षासोबत युती केली, त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दोन दिवस आधी आमदार अभिजीत पाटील आणि भगीरथ भालके यांनी घेतलेल्या निर्णयाचा वचपा पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडीत देशमुखांनी घेतल्याचे मानले जात आहे.
पंढरपूर पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ८, तर राष्ट्रवादी काँग्रेसला सहा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एक आणि भालके गट प्रणित तीर्थक्षेत्र विकास आघाडीला एक अशा भाजपच्या विरोधात ८ जागा निवडून आल्या होत्या, त्यामुळे पंढरपुरात सत्ता स्थापनेबाबत मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, देशमुख यांनी थेट भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
देशमुख हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासोबत जाण्याची कारणे आहेत. मुळात वसंतराव देशमुख हे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक आणि त्यानंतर प्रशांत परिचारक यांच्यासोबत होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी भाजपतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे देशमुख हे पूर्वाश्रमीचे परिचारक गटातीलच होते.
दुसरं म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली होती. पंढरपूरचे अधिकार बऱ्यापैकी अभिजीत पाटील यांच्याकडे होते. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आमदार पाटील यांनी भगीरथ भालके गटाशी युती करण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांना बसला.
कासेगाव गटातून वसंतराव देशमुख यांनी राष्ट्रवादीकडून संजय वाघमारे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्याच्या गटात भालके गटातून भगीरथ भालके यांचे बंधू व्यंकट भालके हे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत होते. आमदार अभिजीत पाटील यांच्या निर्णयामुळे वाघमारे यांचा पराभव झाला, असा देशमुखांच्या कार्यकर्त्यांचा आरोप होता. त्यामुळे अभिजीत पाटील यांनी ऐनवेळी घेतलेल्या निर्णयामुळे आपल्या माणसाचा पराभव झाला, ही खंत वसंतराव देशमुख यांच्या मनात होते.
पंचायत समितीत बहुमतासाठी भाजपला एक जागेची गरज होती. कासेगाव गणातून वसंतराव देशमुख यांचा एक समर्थक निवडून आला होता. त्यामुळे देशमुख यांनी जिल्हा परिषदेत निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा निर्णय घेत प्रशांत परिचारक गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे.
....म्हणूनच देशमुखांशी परिचारकांनी जुळवून घेतले
मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दूर गेल्याचा फटका प्रशांत परिचारक यांना नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत बसला होता. विधानसभा निवडणुकीत प्रशांत परिचारक यांना दोनदा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे युटोपियन शुगरचे प्रमुख उमेश परिचारक यांनी पुन्हा एकदा मराठा समाजातील कार्यकर्त्यांना सोबत घेण्याचे प्रयत्न चालवले होते. त्यातूनच वसंतराव देशमुख यांच्याशी जुळवून घेतण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचा आदेश धुडकावला
पक्षाच्या निर्णयाविरोधात भूमिका घेऊन पक्षाच्या विरोधात मतदान करू नये, असा आदेश जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी वसंतराव देशमुख गटातील पंचायत समितीचे सदस्य प्रमोद देशमुख यांना दिला होता. मात्र, देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचा आदेश धुडकावून लावत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.