

Solapur, 12 (विठ्ठल सुतार) : इराण आणि अमेरिका, इस्त्राईल युद्धामुळे अर्ध्या जगात इंधन आणि गॅस टंचाई निर्माण झाली आहे. संभाव्य वाढती महागाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीचे आवाहन केले आहे. मात्र, सत्ताधारी मंत्र्यांकडूनच त्याचे पालन होत नसल्याचे पुढे आले आहे. कारण, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीसाठी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या तब्बल १५० हून अधिक चारचाकींची गर्दी झाली होती. ही बैठक पूर्वनियोजित होती. मात्र, भविष्यात तरी मंत्र्यांकडून टाळले जाईल, अशी अपेक्षा सोलापूरकरांकडून व्यक्त केली जात आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. १५), तर नियोजन समितीची बैठक २२ मे रोजी आहे. या बैठकीपूर्वी जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी आणि प्रमुख अधिकारी यांनी इंधन व विदेशी मुद्रा बचतीचे उपक्रम कृतीत आणून उदाहरण घालून द्यावे. यामुळे व्यापक जनसहभागाला गती मिळेल, असे आवाहन समर्थ सोलापूर कृती समितीने केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आढावा बैठकीच्या वेळी फज्जा उडाल्याचे दिसून आले आहे. नियोजन समितीवर पालकमंत्र्यांच्या कोट्यातून आपली वर्णी लागावी, यासाठी अनेक इच्छुकांनी गोरे यांची बैठक घेतली. तसेच अनेक आमदारही आढावा बैठकीला उपस्थित होते.
कोणाची किती वाहने...
08 : पालकमंत्री गोरे - शासकीय ताफ्यासह
30 : आमदार व पदाधिकारी
50 : पक्षांचे कार्यकर्ते
25 : विभागप्रमुख व प्रमुख अधिकारी
25 : इतर वाहने
सर्वांनी देशहिताचा विचार करावा : पालकमंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन हे देशहिताचा विचार करूनच आहे. या आवाहनाचे प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी अनुकरण करावे, अशी अपेक्षा आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी इंधनाचा कमीत कमी वापर कसा होईल, यावर भर द्यावा. सोने खरेदी कोणी करणार नाही, असे सराफ व्यावसायिकांना वाटत असले तरी त्यामागे देशहिताचा विचार आहे. त्यामुळे सर्वांनी देशहिताचा विचार करावा, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.
वैयक्तिक वाहनांचा वापर टाळावा : जिल्हाधिकारी
इंधन बचतीसह इतर सूचनाही पंतप्रधानांनी केल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन स्वतंत्र परिपत्रक काढणार आहे. बैठका व दौऱ्यांसाठी, तसेच कार्यालयात येताना-जाताना सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी वैयक्तिक वाहनांचा वापर टाळावा. त्याऐवजी एकाच वाहनातून सर्वांनी प्रवास करावा. सार्वजनिक वाहतुकीचाही अधिकाधिक वापर करावा, आदी महत्त्वाच्या सूचना या परिपत्रकात असणार आहेत. इंधन बचतीसाठी सर्वांचे योगदान मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी सांगितले.
घोषणा 100 बसेसची; दीड वर्षापासून एकही मिळेना
सार्वजनिक प्रवासी व्यवस्था सुधारण्यासाठी राज्य सरकरने शहरासाठी एकूण 100 ई-बसेस मंजूर केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 40 बसेस येणार असून, त्यासाठीची आवश्यक पायाभूत सुविधा महापालिका व महावितरणकडून तयार करण्यात आली आहे. राज्य सरकार व कंपनी यांच्यातील करारातील काही तांत्रिक कारणांमुळे अद्याप निर्णय प्रलंबित आहे. सध्या मार्गावर १८ बसेस धावत आहेत. दीड वर्षापासून लोकप्रतिनिधींकडून घोषणा केली जात असली तरी प्रत्यक्षात प्रवासी सेवा अद्याप सक्षम झालेली नाही.
सोलापुरातील सार्वजनिक प्रवासी सेवा
महापालिका परिवहनच्या बसेस : 22
मार्गावर धावणाऱ्या बसेस : 18
शहरी मार्गावरील बसेस : 05
ग्रामीण मार्गावरील बसेस :13
शहरात धावणाऱ्या रिक्षा : 15 हजार
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.