
Kolhapur News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर रविकांत तुपकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्याने शेट्टी आणि तुपकर यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. एवढंच नव्हे तर तुपकरांनी शिस्तपालन समितीच्या बैठकीकडेही पाठ फिरवल्यामुळे 'स्वाभिमानी' फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, आता तुपकर आणि शेट्टी लवकरच समोरासमोर येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे 'स्वाभिमानी'तील अंतर्गत वाद मिटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेट्टी आणि तुपकर यांच्यातील मतभेदामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा आहेत. पण आता या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवण्यासाठी संघटनेकडून महत्वाची पाऊलं उचलली जात आहेत.
२६ ऑगस्टला तुपकर आणि शेट्टी यांना समोरासमोर बोलवण्यात आले असल्याची माहिती समितीचे सदस्य संदीप जगताप यांनी दिली आहे. त्यामुळे शेट्टी आणि तुपकर यांच्यातील मतभेदावर संघटना काय तोडगा काढते, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
स्वाभिमानीचे नेते संदीप जगताप यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की, "२६ ऑगस्टला कोल्हापूरमध्ये तुपकर आणि शेट्टी यांना समोरासमोर बोलवण्यात येणार आहे. संघटनेतील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी २६ ऑगस्ट ही अंतिम तारीख असेल. संघटनेतील वाद मिटला पाहिजे, संघटना एकसंघ राहिली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे", असे स्पष्टीकरण जगतापांनी दिले.
रविकांत तुपकर याआधी शिस्तपालन समितीसमोर उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर तुपकरांनी शेट्टींना 10 पानी पत्र पाठवत पत्राच्या माध्यमातून आपण का नाराज आहोत, याबाबत सविस्तर म्हणणे मांडल्याचे सांगण्यात येत आहे. आता शेट्टी आणि तुपकर समोरासमोर येणार का?,'स्वाभिमानी' अंतर्गत वादळ शमणार का, याची उत्सुकता आहे.
Edited By- Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.