Vishwajeet Kadam News: सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन महाविकास आघाडीत मोठा वाद निर्माण झाला होता. जिल्ह्यातील दोन पाटलांनी या जागेवर दावा केल्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आमने-सामने आले होते. अखेर शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली, शिवाय ती कायम राहणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
ठाकरेंच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. विश्वजीत कदमांनी (Vishwajeet Kadam) अनेक प्रयत्न करुनही त्यांना ही उमेदवारी काँग्रेसकडे खेचून आणता आली नाही. विश्वजीत कदमांची वरिष्ठांनी समजूत काढली असली तरीही सांगलीची जागा काँग्रेसला (Congress) मिळाली नसल्याचं शल्य त्यांच्या मनात अद्याप कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण नुकतेच त्यांनी एका कार्यक्रमात मनातील खदखद बोलून दाखवली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कदम म्हणाले, सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा होता. परंतु, सांगलीत काहीतरी कारस्थान शिजल्यामुळे ही जागा काँग्रेसकडून गेली. मात्र, आमचा सांगली जिल्ह्यावरचा दावा कोणीही संपुष्टात आणू शकत नाही. हा जिल्हा हा काँग्रेसचा आहे, शिवाय आता सांगलीच्या बाबतीत काहीतरी षडयंत्र घडलं आहे. त्यामुळे जी जागा ठाकरे गटाला गेली आहे. परंतु, आम्ही हे षडयंत्र शोधून काढणार असल्याचं कदम म्हणाले. कदमांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं असून त्यांचा रोख जयंत पाटील यांच्याकडे असल्याच्या चर्चाही रंगी लागल्या आहेत.
यावेळी बोलताना त्यांनी विशाल पाटलांच्या बंडखोरीवरही भाष्य केलं. ते म्हणाले, विशाल पाटील (Vishal Patil) हे काँग्रेसपासून दूर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईबाबत निर्णय दिल्लीतील पक्षश्रेष्ठी घेतील. परंतु पाटील आणि मी दोघांनी सांगलीत काँग्रेस वाढवण्याच काम केलं असल्याचं सांगायलाही कदम यावेळी विसरले नाहीत. त्यामुळे कदम यांच्या मनात विशाल पाटलांविषयी असणारी आपुलकी यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आली.
दरम्यान माजी आमदार विलासराव जगताप यांनी विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळण्यास जयंत पाटील जबाबदार असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते, महाराष्ट्रातील सगळ्या नेत्यांची तिकीट स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या हातात होती. परंतु, त्यांचा नातू विशाल पाटील यांना तिकीटासाठी मुंबई, दिल्ली, नागपूरला हेलपाटे मारावे लागले. ही दु:खद घटना आहे. काँग्रेस पक्षात चाललंय काय? कोणाचं ऐकून तुम्ही काम करत आहात? यामागील कळीचे नारद जयंत पाटील आहेत. पाटील यांना तिकीट न मिळण्यामागे सगळी खेळी जयंत पाटलांनी केली, ते यामागचे खलनायक आहेत, असा आरोप जगताप यांनी केला होता.
(Edited By Jagdish Patil)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.