
Sangli NCPSP march : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या समर्थनात आज सांगली इथं राज्यस्तरीय मोर्चा काढण्यात आला. अहिल्यानगरमधील खासदार नीलेश लंके या मोर्चात सहभागी झाले होते. खासदार लंके यांनी भाजपच्या हिंदू-मुस्लिम राजकारणावर घणाघात करताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
'नेते मंडळीचा धाक असतो. तो इथं दिसत नाही. पोटात एक अन् ओठात एक, असं असल्यावर हे थांबणारच नाही. विकासापासून दुसरीकडे लक्ष नेण्यासाठी हे प्रकार यांना करायचेच आहेत,' असा टोला खासदार लंकेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.
भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यासह त्यांच्या आईवडिलांविषयी खालच्या भाषेत टिका केली. आमदार पडळकर यांच्या विधानावरून राज्यात चांगलाच गदारोळ झाला. आता जयंत पाटील अन् पडळकर यांचे समर्थक राज्यात समोरासमोर येत असून, निषेध नोंदवत आहे.
जयंत पाटील यांच्या समर्थनात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाने सांगलीत राज्यस्तरीय मोर्चा काढला. अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी मोर्चात सहभागी होत भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता जोरदार फटकेबाजी केली.
नीलेश लंके म्हणाले, "गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकारणाला एक सुसंस्कृतपणा होता. यशवंतराव चव्हाण यांचा हा सांगली जिल्हा राज्यालाच नव्हे तर, देशाला देखील दिशा देणारा म्हणून ओळखला जातो. यशवंतराव चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवून शरद पवार यांनी देखील राज्यात राजकारण केलं. पण कधीही गलिच्छ पद्धतीने राजकारण केलं नाही. सुसंस्कृतपणा राजकारणात टिकून होता. व्यक्तिगत टिका होत नव्हत्या." परंतु जाणीवपूर्वक या राज्याच्या प्रमुखांकडून काही व्यक्तींना राज्यातील वातावरण दूषित करण्यासाठी पाठवलेला आहे, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांचे नाव न घेता लंकेंनी टोला लगालवा.
'शरद पवार यांच्या आदर्शावरच राजकारण करणारे जयंत पाटील यांच्यावर एका वाचाळवीराने खालच्या पातळीवर टीका केली. याचा संपूर्ण राज्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून निषेध करण्यात आला आहे. या गोष्टी थांबल्या पाहिजेत, आपण दुसऱ्यासाठी खड्ड्या खोदत असताना आपण पण एक दिवस त्याच खड्ड्यात पडत असतो, हे राजकारण्यांनी विसरू नये. हे पक्षाच्या प्रमुखांनी देखील खबरदारी घेतली पाहिजे,' असे खासदार लंकेंनी म्हटले. हे वाचाळीवीर कोणाच्या हिमतीवर बोलतात, ताकदीवर बोलतात. एवढं गलिच्छ बोलल्यावर देखील जयंत पाटील यांनी अतिशय सुसंस्कृतपणे प्रत्युत्तर दिले. हा आदर्शपणा जपला पाहिजे, असेही खासदार लंके यांनी म्हटले.
अशी स्टेटमेंट करण्यामागे गोपीचंद पडळकरांना कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ आहे का? यावर बोलताना खासदार लंके म्हणाले, "मीडियासमोर सल्ला देणे आणि बाजूला घेऊन सल्ला देणे यात चांगलाच फरक असतो, आमच्याकडून चुकीचे स्टेटमेंट गेल्यावर आमचे नेते मंडळी सांगतात की, हे चुकीचं स्टेटमेंट गेलं आहे. तर आम्ही ते पुन्हा उच्चारात देखील नाही. हा नेते मंडळीचा धाक असतो." पण इथं पोटात एक अन् ओठात एक, असं असल्यावर हे थांबणारच नाही, विकासापासून दुसरीकडे लक्ष नेण्यासाठी हे प्रकार यांना करायचेच आहेत, असा गंभीर आरोप खासदार लंकेंनी केला.
"देशाच्या आणि राज्याचे आर्थिक परिस्थिती पाहिल्यास, विकासावर कोणीही नेता बोलायला तयार नाही. जातीपातीच्या बोलण्याचे प्रकार अधिक गेले जात आहेत. 2014 अगोदर सर्व समाज बांधव एकत्र येऊन सण साजरा करायचे. पण यानंतर हिंदू-मुस्लिम, देशात आणि राज्यात करण्याचे मोठे प्रकार झाले. त्यावर निवडणुका लढवल्या गेल्या. नंतरच्या काळामध्ये जाती-जातीमध्ये अन् उपजातींमध्ये संघर्ष निर्माण केला जात आहे," असा गंभीर आरोप करत खासदार लंकेंनी भाजप महायुतीवर निशाणा साधाला.
खासदार लंकेंनी भाजपला धोका सांगितला
"एखादा समाजाचा उल्लेख केला तर, तो कोणत्या कॅटेगिरीमध्ये मोडतो, हे देखील पूर्वी सांगता येत नव्हते. परंतु आता जाती-उपजातींचा संघर्ष वाढला आहे. तसा करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो आहे. प्रगत राष्ट्रातील नेते हे विकासावर बोलतात. परंतु आपल्या देशातील आणि राज्यातील नेते हे जातीपातीवर बोलतात. हे देशाच्या राज्याच्या विकासासाठी घातक आहे. त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. राज्या-राज्यांमध्ये चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करत फिरणारे आहेत, हे कुठेतरी थांबले पाहिजेत, नाहीतर हे तुमच्या बाबतीत देखील बोलण्यास मागे पुढे पाहणार नाहीत," असा सूचक धोक्याचा इशारा खासदार लंके यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.