

Sangli ZP Ajit Pawar NCP : जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 18, काँग्रेसचे 11, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एक सदस्य विजयी झाला आहे. राज्यात महाविकास आघाडीत व केंद्रात इंडिया आघाडीत असलेल्या या तीन पक्षांचे 30 सदस्य जिंकले आहेत. बहुमतासाठी एक सदस्याची गरज आहे. भाजपकडे 16, शिवसेनेचे 7, रयत व जनसुराज्यचा प्रत्येकी एक असे 25 सदस्य झाले आहेत.
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सहा सदस्य ज्यांच्यासोबत जातील त्यांची सत्ता असेल, असे ढोबळ चित्र दिसते आहे. या स्थितीत घोरपडे आणि संजय पाटील यांनी थेट आपली पसंती आघाडीला दिली आहे, तर माजी आमदार विलासराव जगताप यांनी चेंडू पक्ष नेतृत्वाकडे टोलवला आहे. शिंदे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका जाहीर केली आहे.
माजी खासदार संजय पाटील म्हणाले, ‘‘मी तासगाव पंचायत समितीवर लक्ष केंद्रित केले होते. एका ठिकाणी पुतण्याच लढत होते. एका ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. खूप वर्षांनी पंचायत समिती खेचून घेतली. जिल्ह्यात एकत्र राहणार आहोत. महाआघाडी म्हणूनच लढलो आहोत, त्यामुळे महाआघाडी म्हणूनच पुढे जाऊ. वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा करून अंतिम निर्णय होईल.’’
माजी मंत्री अजितराव घोरपडे म्हणाले, ‘‘भाजपच्या विरोधात मतदारांमध्ये असंतोष होता. तो दिसला आहे. महाविकास आघाडीसोबत राष्ट्रवादीने निवडणूक लढलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचीच सत्ता असेल. वरिष्ठांशी चर्चा होईल, मात्र स्थानिक पातळीवर आम्हाला आघाडीच योग्य वाटते आणि तसाच निर्णय घेतला जाईल.’’
आमदार सुहास बाबर म्हणाले, ‘‘खानापूर, आटपाडी तालुक्यात धनशक्तीविरोधात काम अशी लढाई झाली. ती आम्ही जिंकली. सतत कामात आहोत, लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होतोय. मी काही नवखा नाही, पंचायत समिती व जिल्हा परिषदेला दहा वर्षे काम केले आहे. लोकांनी ते पाहिले आहे. त्याला लोकांनी पसंती दिली. आता सत्ता स्थापनेचे काय, याबाबत आम्ही शांतपणे थांबा आणि पाहा, या भूमिकेत आहोत. वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.’’
माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले, ‘‘जतमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचा एक सदस्य विजयी झाला आहे. आमची काँग्रेससोबत निवडणूकपूर्वी आघाडी होती. आम्हाला आणखी काही जागांवर विजयाची संधी होती, मात्र खूप चुका झाल्या. आता वेळ गेली आहे. सत्तेबाबत काय करायचे, याचा निर्णय आमच्या पक्षाचे नेते घेतील. आम्ही पक्ष चिन्हावर लढलो आहोत, पक्षाने ताकद दिली होती. जो आदेश येईल, त्याप्रमाणे निर्णय घेऊ.’’
माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले, ‘‘आम्ही शिराळा तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रपणे लढलो होतो. आम्ही चारपैकी तीन जागा जिंकल्या आहेत. तालुक्यात भाजपला एकही गटाची जागा मिळालेली नाही. एक जागा जनसुराज्य शक्ती पक्षाची आहे. पंचायत समितीतही आठपैकी सहा जागा जिंकल्या आहेत. दोन्हीकडील समीकरणे पाहता, आम्ही काँग्रेस आघाडीसोबत रहावे, असा सर्वांचा कल आहे. ही वस्तुस्थिती आम्ही नेत्यांपर्यंत पोहोचवू. दोन दिवसांत त्याबाबतचा अंतिम निर्णय होईल.’’
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.