

Kolhapur News : लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीच्या आशा उंचावल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जमिनीवर आपटले. जिल्ह्यात महाविकास आघाडीला दहा पैकी एक ही जागा निवडून आणता आली नाही. महायुतीचे घोडे सुसाट धावले असून जिल्ह्यात दहा शून्य अशी आघाडी घेत मैदान मारले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दुसऱ्या फळीतील नेत्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात केलेल्या सभा, सभेच्या माध्यमातून विकासकाम मतदारांना पटवून दिल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीला घवघवीत यश दिले.
महायुती मधील नेत्यांमधील समन्वय जिल्ह्यातील नेत्यांचं समयसूचकता हे या यशामागचं गणित आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी मधील नेत्यांचे नसलेले समन्वय महाविकास आघाडीच्या पराभवाला कारणीभूत ठरले.
सत्तेतील मंत्री समन्वय साधून मैदान मारत असताना महाविकास आघाडीचे नेते फक्त आपल्याच उमेदवाराचा विचार करत राहिले. केवळ काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी कोल्हापूरचा किल्ला लढवला. एकाकी झुंज देणाऱ्या सतेज पाटील यांना हा पराभवाचा धक्का मानला जातो. मात्र त्यांनी दिलेली एकाकी लढा हा महायुतीच्या नेत्यांना घाम फोडणारी होती.
कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे पाच उमेदवार, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे तीन उमेदवार, आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन उमेदवार असे एकूण महाविकास आघाडीचे जिल्ह्यात दहा उमेदवार होते. या दहा उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवाचे मुख्य कारण म्हणजे वरिष्ठ नेत्यांनी आपल्याच उमेदवाराला दिलेली पसंती.
कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीसाठी (Mahavikas Aghadi) पूरक वातावरण असताना केवळ आपल्याच उमेदवाराच्या मतदारसंघात घेतलेली सभा आणि त्यातून निर्माण झालेली हवा हे पेल्यातील वादळच ठरले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात येऊन फक्त राधानगरी विधानसभा मतदारसंघात सभा घेत महायुतीला चॅलेंज दिले. एकेकाळी शिवसेनेला या जिल्ह्याने सहा आमदार दिले आहेत. मात्र असे असताना पक्षप्रमुख ठाकरे यांनी एकाच मतदारसंघात सभा घेतल्याने इतर मतदारसंघात सत्ताधाऱ्यांबाबत विरोधाचे वातावरण तयार करू शकले नाहीत.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे कोल्हापूर जिल्ह्यात तीन उमेदवार होते. इचलकरंजी कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघात त्यांच्या सभा झाल्या. कोल्हापूर जिल्ह्यात शरद पवार यांना मानणारा वेगळा गट आहे.
परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यासाठी इतर मतदारसंघात शरद पवार यांची सभा होणे आवश्यक होते. या सभेचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकला असता. मात्र तो फायदा उठवता आला नाही.
दुसरीकडे काँग्रेस नेते सतेज पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यात एकाकी झुंज देताना पाहायला मिळाले. जिल्हास्तरावर महाविकास आघाडीकडे दुसरा चेहरा नसल्याने सतेज पाटील यांना जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघाची जबाबदारी हाती घ्यावी लागली. ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन प्रमुख नेते केवळ भाषणातच अग्रेसर राहिले. त्यांना सच्चा शिवसेना सोबत घेऊन जाता आले नाही.
संपूर्ण प्रचाराची मदार ही सतेज पाटील यांच्या खांद्यावरच होती. यांचा अपवाद वगळता इतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांची साथ सतेज पाटील यांना कमी प्रमाणात मिळाले. काँग्रेस नेते प्रियांका गांधी यांची एकमेव सभा तीन मतदारसंघासाठी झाली.
तर काँग्रेसचे पाच उमेदवार वगळता सतेज पाटील यांनी राधानगरी, शाहूवाडी, चंदगड विधानसभा मतदारसंघात सभा घेत महायुतीच्या विरोधात वातावरण केले. महाविकास आघाडी कडून एकमेव सतेज पाटील यांनी झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.