पंढरपूर : माझ्या भाषणाची व्हिडीओ क्लिप म्हणजे भाजपचे (BJP) षडयंत्र आहे. माझ्या विरोधात आंदोलन करणारे वारकरी संप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी आहेत, अशा शब्दांत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. संतपुरुषांबाबत केलेल्या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सुषमा अंधारे यांच्याविरोधात वारकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली. पण तरीही वारकरऱ्यांमधील रोष कायम आहे. यावरुन सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला आहे.
माझी क्लिप म्हणजे भाजपचे षडयंत्र आहे. पण खरा वारकरी वाद कधीही वाद घालत नाही. किर्तन आणि प्रबोधनाच्या नावाखाली मोहन भागवत संप्रदायाचे काही लोक जर अशा मागण्या करणार असतील तर त्यांच्या मागण्यांना कोणीही भीक घालणार नाही. पण जर माझ्या वक्तव्याने खरचं जर वारकरी दुखवले गेले असतील तर, त्यांची क्षमा मागण्याने मागे हटणार नाही. किंवा त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असू. पण माझ्या ज्या वक्तव्यांचा विपर्यास केला जातोय, तेच वक्तव्य सावरकरांनी लिहून ठेवलं, त्याबद्दल काहीच बोललं जात नाही, मग तुम्ही सावरकरांनाच प्रश्न विचारा ना, त्यांनी असं का लिहीलं. असा सवाल अंधारे यांनी केला आहे.
श्री श्री रविशंकर यांनी देखील हेच लिहून ठेवलयं. पण त्यांना याबद्दल प्रश्न विचारले जात नाही. असे स्वयंघोषित किर्तनकारांनी कित्येकदा टिंगल टवाळीची भाषा केली, तिथे त्यांना रोखलं जात नाही. मुळात माझी पंधरा वर्षांपुर्वीची क्लिप व्हायरल केली. केवळ मी शिवसेनेत असल्यामुळे माझ्या क्लिपा दाखवून प्रश्न विचारले जातात. लाव रे तो व्हिडिओ म्हणते म्हणून विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
प्रसाद लाड, सुधांशू, त्रिवेदी, भगत सिंह कोश्यारी किंवा चंद्रकांत पाटील यांना फुले, शाहू, आंबेडकर, सावरकर हे महापुरुष मोडीत काढायचे आहे. त्यांना फक्त गोळवलकर, हेडगेवार हेच महापुरुष ठेवायचे आहेत, असा आरोपही अंधारेंनी यावेळी केला. पण महाराष्ट्र हे अजिबात खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे पंधरा वर्षांपुर्वीची माझी क्लिप दाखवून माझ्या राजीनाम्याची मागणी करणारे भाजप नेते आशिष शेलार यांच्या बुद्धिमत्तेची कीव करावी वाटते. त्यांच्या पक्षातील मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतात, तेव्हा मात्र त्यांना तेरा दिवस स्मृतीभ्रंश झालाय का, त्यांच्या राजीनाम्याची ते चकार भाषा करत नाहीत, म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायंच वाकून, असा शब्दांत अंधारे यांनी भाजपवर टीका केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.