उद्धव ठाकरेंनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्रासाठी केंद्राकडून पॅकेजची मागणी केली आहे.
राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केंद्राकडे मदतीसाठी आग्रह धरला आहे.
महाराष्ट्रातील संकटावर उद्धव व राज ठाकरे एकाच भूमिकेत आल्याने राजकीय दबाव वाढला आहे.
Raj Thackeray Write Letter To CM Fadnavis : मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागात अतिवृष्टीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. राज्यभरात शेतीचे झालेले नुकसान पाहणीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचे दौरे सुरू आहेत. काल उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केंद्राकडून दहा हजार कोटींचे पॅकेज मिळवण्याची मागणी सरकारकडे केली होती.
त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही केंद्राकडून महाराष्ट्रासाठी मोठे पॅकेज मिळवावे यासह इतर मागण्या करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लिहले आहे. कुठलेही नियम, निकष न लावता महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही राज ठाकरे यांनी या पत्रात केली आहे. उद्धव ठाकरे हे उद्या मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. तर आज मुख्यमंत्री व राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते.
दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल. आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यावर, लक्षात आलं आहे की, कित्येक ठिकाणी जमीन पूर्णपणे खरवडून वाहून गेलेली आहे. मे महिन्याच्या मध्यात जो पाऊस सुरु झाला आहे, त्याने जवळजवळ उघडीप घेतलीच नाहीये त्यामुळे, शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे.त्यामुळे सरकारने खालील सूचनांचा विचार करावा.
1) कुठल्याही निकषांच्या चौकटीत न लावता, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा. एकरी 7 आणि 8 हजार रुपये इतक्या तुटपुंजी नुकसान भरपाईने काहीही होणार नाही. त्याऐवजी एकरी किमान 30 हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करा. कारण आता शेतकऱ्याची घडी बसायला किमान 1 वर्ष लागेल.
2) गेल्या काही वर्षातल्या बेफाम उधळपट्टीने, राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झालेली असली तरी, सरकारने हात आखडता घेऊ नये. वेळेस केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि मदतीचं पॅकेज केंद्राकडून मिळवावं. केंद्र सरकारने बिहारला असं पॅकेज या आधी दिलं आहेच त्यामुळे महाराष्ट्राला द्यायला काही हरकत नसावी. आणि त्यासाठी दिल्लीचा जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करावा. फक्त स्वतःच्या वैयक्तिक तक्रारींसाठी किंवा घटक पक्षातील संघर्षासाठी आम्ही दिल्लीत जातो असं चित्र न दिसता, सरकारमधले सगळे पक्ष राज्यासाठी पण दिल्लीत धाव घेतात हे पण राज्याला दिसू दे.
3) अशा आपत्तीचा पहिला फटका बसतो तो मुला-मुलींच्या शिक्षणाला. एकाही मुलाचं शिक्षण बंद होणार नाही. त्याला लागणारी वह्या-पुस्तकं मिळतील आणि अशा परिस्थितीत सहामाही परीक्षा देताना मुलांच्या मनाची काय स्थिती असेल याचा सरकारने विचार करून काही कृती तात्काळ करावी. हिंदी भाषा लादताना दाखवलेली चपळाई आणि आग्रहीपणा इथे पण दिसेल अशी अपेक्षा.
4) या अशा आपत्तीनंतर रोगराई प्रचंड वाढते त्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सतर्क राहील हे देखील सरकारने पहावं. जिल्हा रुग्णालयांपासून ते आरोग्य केंद्रांपर्यंत, सगळीकडे औषधांचा तुटवडा पडणार नाही हे सरकारने पहावं.
5) अशा संकटानंतर कर्जाच्या हप्त्यासाठी सुरु होणारा बँकांचा तगादा हा फारच तापदायक विषय असतो. एकतर बँकांना योग्य ती समज सरकारने आत्ताच द्यावी, अन्यथा आमचे महाराष्ट्र सैनिक ती देतीलच.
सरकारने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचं कामच आहे. पण त्याची जाहिरातबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. त्यामुळे या सगळ्या मोहापासून दूर राहून सरकारने, प्रशासनाने आता एकरी किमान 30 ते 40 हजाराची मदत घोषित करावी आणि शेतकरी आणि त्याचं कुटुंब पुन्हा उभं राहील हे पहावं, अशा शब्दात राज ठाकरे यांनी सरकारला चिमटे काढले आहेत.
प्र.१: राज ठाकरेंनी कोणाला पत्र लिहिले?
उ.१: राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले.
प्र.२: या पत्रात कोणती मागणी केली आहे?
उ.२: महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारकडून पॅकेज मिळावे अशी मागणी केली आहे.
प्र.३: याआधी हीच मागणी कोणी केली होती?
उ.३: याआधी उद्धव ठाकरे यांनीही केंद्राकडून महाराष्ट्रासाठी पॅकेजची मागणी केली होती.
प्र.४: या मागणीमागे मुख्य कारण काय आहे?
उ.४: महाराष्ट्रातील शेतकरी आणि आपत्तीग्रस्त जनतेला मदत मिळावी हा उद्देश आहे.
प्र.५: या मागणीचा राजकीय परिणाम काय होईल?
उ.५: उद्धव आणि राज ठाकरे दोघांनीही एकाच मुद्द्यावर भूमिका घेतल्याने केंद्रावर दबाव वाढू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.