
Latur News : मी आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावे, अशी समाजाची इच्छा आहे. माझी तयारी आहे. बाबासाहेबांचा पक्ष बाळासाहेबांनी चालवावा. त्यांची वंचित बहुजन आघाडी बंद करुन या पक्षात यावे. मंत्रीपद सुद्धा त्यांनी घ्यावे मी पक्षाचे काम करेन, अशी साद केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) चे रामदास आठवले यांनी घातली. प्रकाश आंबेडकर यांच्यापुढे पुन्हा एकदा आठवले यांनी ऐक्यासाठी पुढाकार घेतला आहे.
लातूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी ऐक्यावर भाष्य केले. रिपब्लिकन पक्ष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष आहे. सध्या मी या पक्षाचा अध्यक्ष आहे, पक्ष देशभर विस्तारत आहे. पण अॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) व मी एकत्र यावे तर ऐक्य होईल, अशी समाजाची अपेक्षा आहे. माझी तयारी आहे, बाबासाहेबांचा पक्ष बाळासाहेबांनी चालवावा, असे आठवले म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बंद करुन या पक्षात यावे. माझे मंत्रीपद सुद्धा त्यांनी घ्यावे मी पक्षाचे काम करेन, असेही आठवले म्हणाले.
राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद निर्माण झाला आहे. मनसेने हिंदी भाषा सक्तीने शिकवण्यास विरोध दर्शवला आहे. यावरही रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी रोखठोक भूमिका मांडली. मनसेची दादागिरी सरकारने खपवून घेऊ नये, असे सांगतानाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या घरी जाणे बंद करावे, असे आवानही केले. मराठी भाषेबद्दल आम्हालाही अभिमान आहे.
मराठी भाषा शिकलीच पाहिजे परंतू उठसूट परप्रांतियांना धमक्या देण्याचे प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सातत्याने होते आहेत. मनसेची ही दादागिरी खपवून घेवू नका. दादागिरीला दादागिरीनेच उत्तर दिले जाईल. मुख्यमंत्र्यानी या कडे लक्ष द्यावे. राज ठाकरे यांना जवळ केल्याने महायुतीचा कधीच फायदा होणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाणे बंद करावे, असा सल्लाही आठवले यांनी त्यांना दिला.
महायुतीत मी असताना राज ठाकरेंची गरजच काय? लोकसभेत त्यांना जवळ घेवून पाहिले आहे, त्यांचा उपयोग झालेला नाही. विधानसभेत ते दूर गेले तर महायुतीला 237 जागा मिळाल्या. मनसे ही महाराष्ट्राची पार्टी होवू शकत नाही. मनसे केवळ मराठी मराठी करीत आहे. मराठी भाषेचा आम्हालाही अभिमान आहे. ती शिकलीच पाहिजे, त्याची सक्तीही केली पाहिजे. पण अशा पद्धतीने मुंबईत दादागिरी सुरु असेल तर मुंबईची अर्थव्यवस्था कोलमडेल, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे. मला घेतल्याशिवाय सरकार येणे अशक्य आहे. मी असताना राज ठाकरेंची काय गरज आहे. ते एक इव्हेन्ट मॅनेजमेंट नेते आहेत. त्यांच्या सभांना गर्दी होते पण मते मात्र मिळत नाहीत.
त्यांनी महाराष्ट्राचे नुकसान करु नये, असे आवाहनही आठवले यांनी केले. वन नेशन वन इलेक्शनचा निर्णय सर्वच राजकीय पक्षांशी चर्चा करुन होईल. देशाच्या हितासाठी तो योग्य आहे. मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे स्मारक होणार आहे. जातीय जनगणना करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते राहूल गांधी करीत आहेत. पण त्यांची सत्ता असताना मात्र त्यांनी काहीच केले नाही. जातीय व्यवस्था संपुष्टात आणा, असे आपले संविधान सांगते, त्यामुळे केंद्राच्या काही अडचणी आहेत. असे असले तरी जातीय जनगणना झाली पाहिजे, असे आमच्या पक्षाचे मत असल्याचे आठवले यांनी सांगितले.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.