

Mumbai News : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघाताबाबत दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ,पवार कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्रच शोकसागरात बुडाला. अशातच त्यांच्या मृत्यूवर शंका उपस्थित करतानाच तो घातपात असल्याचा आरोपही केला जात आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेत काही प्रश्न उपस्थित केले होते. आता त्यांनी थेट दिल्ली गाठत मोठं पाऊल उचललं आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे दिल्लीत दौऱ्यावर असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी दिल्लीत हवाई क्षेत्रात वैमानिक व अन्य पदांवर राहिलेल्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या असून त्यात दुर्घटनेसंबंधीचा अहवाल येण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणाचा अहवाल तातडीनं मिळण्यासाठी खासगी गुप्तहेरांची मदत घेत असल्याचं समोर येत आहे.
रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणाला आता वीस दिवस उलटून गेल्यानंतरही अद्यापही DGCA चा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला नसल्याचं पोस्ट करत म्हटलं आहे. तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात देखील काहीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नसल्याची बाब अधोरेखित केली आहे.
परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत. त्यामुळे DGCA ने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल देण्याची मागणी रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केली आहे. तसेच त्यांनी VSR वर योग्य ती कारवाई करण्यात यावी असंही म्हटलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर 13 दिवसांनी पत्रकार परिषद घेत आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. अजितदादांसोबत नेमकं 28 जानेवारी मुंबईहून निघाल्यापासून ते बारामती विमानतळावरील दुर्घटनेपर्यंत नेमकं काय घडलं याचा संपूर्ण घटनाक्रम समोर आणल्यामुळे अनेकांच्या मनात अजितदादांचा घात की अपघात याबाबत पुन्हा एकदा शंकेची पाल चुकचुकली होती.
आमदार रोहित पवार यांनी यावेळी पत्रकार परिषदेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, अजितदादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री, काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल, आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबडीत अजितदादा विमानाने बारामतीला जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट ऐनवेळी का बदलण्यात आले? व्हीएसआर कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कुणी दिलं, त्याचा अहवाल समोर का येत नाही असे एक ना अनेक प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित करत तपासयंत्रणावर दबाव वाढवला होता.
रोहित पवार यांनी व्हिएसआर विमान कंपनी, अॅरो कंपनी आणि कपूर नावाचा पायलट यावर आमची शंका असल्याचा दावाही केला होता. या सर्व चर्चेत अॅरो नावाच्या कंपनीने व्हिएसआरचं विमान हायर केलं होतं. सरकारी जीआर नुसार घेतलं होतं. पवार नावाचा माणूस अॅरोचा हँडलर आहे. त्याने व्हिजिबिलीटी क्लिअर असल्याचं म्हटलं आहे. ही कंपनी बऱ्याच राज्यात काम करत आहे. या कंपनीचा राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचा खळबळजनक दावाही पवार यांनी यावेळी केली.